व्यंकटेश वैष्णव , बीड पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले; परंतु, वरुणराजा रुसलेलाच आहे. निसर्गाने अशी थट्टा मांडलेली असताना मायबाप सरकारला दुष्काळ पहायलाही वेळ नाही. दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी बीडला येणाऱ्या दिल्लीच्या पथकाचा दौरा रद्द झाल्याने सरकारी यंत्रणा कशी सुस्तावली आहे, याची प्रचिती जिल्हावासियांना आली आहे. जिल्हा मागील तीन वर्षांपासून दुष्काळी चटके सोसत आहे. खालावत चाललेल्या पाणीपातळीने तर टंचाईचे सावट आणखीच बिकट केले आहे. उद्धवस्थ झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. जिल्ह्यात सहा महिन्यात दीडशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. यावरुन जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीचे उग्ररुप अधोरेखित होते. चालू वर्षी बरोबर ७ जूनच्या मुहूर्तावर कोसळलेल्या सरींनी शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते. कर्ज काढून, सोने गहाण ठेवून शेतकऱ्यांनी बी- बियाणाची तरतूद केली. पेरलेले बियाणे कुठे उगले तर कुठे उगवले नाही. त्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा बरसलाच नाही. त्यामुळे पाच लाख हेक्टरवरील खरीप पिके हातची गेली. दोन महिने उलटले तरीही पाऊस न झाल्याने आता दुबार पेरणीची संधीही गेली आहे. कोट्यवधींचे बियाणे ‘माती’त गाडलेल्या शेतकऱ्यांना पिकापेक्षा जित्राबाचीच जास्त चिंता आहे. जिल्ह्यावर ओढावलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्रसिंग व केंद्रीय फलोत्पादन आयुक्त अतुुल पाटणे हे ३१ जुलै व १ आॅगस्ट रोजी बीडमुक्कामी येणार होते. पीक- पाण्याची परिस्थिती थेट बांधावर जाऊन ते पाहणी करणार होते. त्याचा अहवाल केंद्र सरकारला जाणार होता. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास यासंदर्भातील पत्र आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन तयारीला लागले होते. दुष्काळ निवारण पथकाला कुठल्या भागातील पिके दाखवायची? पाणीपातळी तपासण्यासाठी कोठे न्यायचे? इथपासून ते मुक्कामाची व्यवस्था कोठे करायची? इथपर्यंतचे नियोजन सुरुहोते. मात्र, बुधवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना पथकाचा दौरा रद्द झाल्याचे पत्र आले आहे. त्यामुळे पावसापाठोपाठ सरकारी यंत्रणाही बीडपर्यंत पोहोचण्यात विलंब करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निसर्ग तर कोपलाच, दुष्काळ निवारण पथकाचीही बीडला हुलकावणी
By admin | Updated: July 30, 2015 00:13 IST