बिडकीन : बिडकीनजवळील बंगला तांडा येथे शुक्रवारी जुन्या माठातील पाणी प्यायल्याने एका मजूर महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी वाढतच चालले आहे. शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे निश्चित कारण दिले नसल्याने विषबाधा नेमकी कशी झाली, याचे कोडे उकलण्याचे आव्हान बिडकीन पोलिसांपुढे उभे आहे. शुक्रवारी (२३ मे) दुपारी बंगला तांडा (ता. पैठण) येथील भीमा भालेकर यांच्या शेतात कांदे काढण्यासाठी गेलेल्या चार मजूर महिलांनी तेथील अडगळीत पडलेल्या जुन्या माठात विहिरीचे पाणी टाकून ते प्यायले होते. यानंतर काही वेळातच त्यांना त्रास जाणवू लागला. दुसर्या काही मजुरांनी त्या चार महिलांना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हा विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात येताच चारही महिलांना तातडीने पुढील उपचारकामी घाटी दवाखान्यात पाठविले. त्यानंतर सायंकाळी पार्वताबाई राठोड (६५) या मजूर महिलेचा मृत्यू झाला, तर सीताबाई राठोड (४५), कमळाबाई आडे (६५), कलाबाई राठोड यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पार्वताबाईचे शवविच्छेदन घाटी रुग्णालयात करण्यात आले; परंतु तिचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचे डॉक्टरांनी निश्चित कारण अहवालात नमूद केले नसल्याने पोलीसही चक्रावले आहेत. डॉक्टरांनी मयताचा व्हिसेराही राखून ठेवला आहे. त्यामुळे बिडकीन पोलिसांनी सध्यातरी मयताच्या नातेवाईकांचा जाबजबाब घेणे सुरू केले आहे. अद्याप या प्रकरणी कोणीही तक्रार केली नसल्याचे जमादार पटारे यांनी सांगितले. मयत पार्वताबाईवर आज बंगला तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)अडगळीत पडलेला तो माठही पोलिसांनी जप्त केला असून तोही छावणी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. या जुन्या माठाचा वापर पिकावरील कीटकनाशक फवारणीसाठी झाला असावा आणि त्यातच या महिलांनी पाणी भरले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, जुना माठ शेतमालकाने नष्ट करायला हवा होता, अशी चर्चाही गावात सुरू आहे.
बिडकीनजवळील विषबाधेचे गूढ वाढले
By admin | Updated: May 25, 2014 01:31 IST