औरंगाबाद : महापालिकेची अवस्था दिवाळखोरीत आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. शहरातील विकासकामे ठप्प आहेत. रस्त्यांची कामे बंद आहेत. समांतरला १५ कोटी कुठून द्यायचे. या अशा अनेक आर्थिक संकटांवर मात करीत पालिकेची यंत्रणा पुढे सरकत असतानाच नगरसेवकांना दरमहा २५ हजार रुपये मानधन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्याचा विचार भाजप नगरसेवकांच्या डोक्यात घोळू लागला आहे. येणाऱ्या सभेत ठराव मांडून तो मंजूर करू न शासनाकडे पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. सर्व नगरसेवकांसाठी समावेशक अशी ही मागणी असल्याचा सूर भाजपच्या गोटातून आळविण्यात आला. सध्या ११५ नगरसेवक आहेत. त्यांना दरमहा मानधनासाठी ८ लाख ५ हजार रुपये मनपा तिजोरीतून द्यावे लागतात. वर्षाला ९६ लाख ६० हजार रुपये मानधनासाठी लागतात, तर ५ वर्षांत ४ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च नगरसेवकांच्या मानधनावर होतो. २५ हजार मानधन दिल्यास काय?११५ नगरसेवकांना दरमहा २८ लाख ७५ हजार लागतील. वर्षाला ३ कोटी ४५ लाख लागतील. १७ कोटी २५ लाख ५ वर्षांत नगरसेवकांना मानधनासाठी द्यावे लागतील. २० कि़मी. रस्त्यासाठी येणारा खर्च मानधनावर करावा लागेल. अर्थसंकल्पाच्या एकूण उत्पन्नातील ५ टक्के खर्च नगरसेवकांच्या मानधनावर होईल. उपमहापौर म्हणालेउपमहापौर प्रमोद राठोड म्हणाले, २५ हजार मानधन असावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाला जुने धोरण बदलण्याची देखील विनंती करण्यात येईल. ७ हजार रुपये मानधन खूप कमी आहे. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडून तो मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात येईल. इतर मनपात किती मानधन?नाशिक मनपात ६ हजार रुपये मानधन असून ती ब वर्गात आहे. पुणे पालिकेत ७ हजार ५०० रुपये मानधन असून ती अ वर्गात आहे. राज्यातील २५ पालिकांमध्ये एकच मानधन पद्धती आहे. ते मानधन वाढविण्यासाठी शासकीय पातळीवर नगरविकास विभागाकडून सर्वंकष निर्णय झाला तरच यात बदल होऊ शकेल. अन्यथा बदल होणार नाही. औरंगाबाद मनपात नगरसेवकांना स्वेच्छा निधी दिला जातो.प्रत्येकाला दरवर्षी ५ लाख स्वेच्छा निधी आहे, असे सूत्रांनी सांगितले. ५ कोटी ७५ लाख वर्षाला तर ५ वर्षांत २९ कोटी स्वेच्छा निधी देते.
दिवाळखोर मनपाच्या नगरसेवकांना हवे २५ हजार मानधन
By admin | Updated: June 17, 2016 00:40 IST