जालना : जालना शहरातील नागरी समस्या सोडविण्या व मुलभूत सुविधा देण्याबाबत आढावा बैठकीत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रभारी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला आहे. नगरपालिकेच्या प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर नागरी समस्या सोडविण्याबाबत चार आढावा बैठका घेतल्या. तसेच मुख्याधिकार्यांना समक्ष चर्चा करून सूचना दिल्या. तरीही समस्या सोडविण्याकडे मुख्याधिकार्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरासाठी मुबलक पाणीपुरवठा होत असतानादेखील अनेक प्रभागात नियमित व वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. दहा ते पंधरा दिवसआड पाणी दिल्या जाते. मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. अंतर्गत पाईपलाईन व गळतीमुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शहराचा वीजपुरवठा चालू करण्यासाठी पालिकेने १ कोटी ८० लाखांचे बील भरून सहा महिने झाले तरीही शहरात पथदिवे चालू केलेले नाहीत. संपूर्ण शहर अंधारात आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मस्तगड येथील पंपहाऊस व फिल्टरबेडमधील काही विद्युतपंप बंद आहेत. न.प.मालकीच्या खुल्या जागांवर अनधिकृत ताबा व अतिक्रमण वाढले आहे, अशा अनेक समस्यांबाबत वारंवार सूचना करूनही त्याची गांभिर्याने दखल घेतली जात नसल्याची खत त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
नागरी समस्या सोडविण्यास पालिका प्रशासन असमर्थ
By admin | Updated: May 22, 2014 00:15 IST