उदगीर : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे प्रसूत महिलेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी चौकशी समितीचा अहवाल येण्याअगोदरच वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ परत घेण्याची मागणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे सोमवारी केली आहे. वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही, तोपर्यंत काम बंदचा पवित्रा या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात हीना जळकोटे (रा. आझादनगर, उदगीर) ही महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. परंतु, यावेळी त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे त्यांच्यावर डॉ. अंजुम कादरी यांनी उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले. लातूर येथे उपचार चालू असताना हिना जळकोटे या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी हीना जळकोटे यांचे सासरे बाहुद्दीन जळकोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिसांनी रविवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजुम कादरी व एका परिचारिकेविरुद्ध कलम ३०४ (अ) भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. सोमवारी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा परत घेण्याची मागणी केली. शिवाय, सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही, तोपर्यंत काम करणार नसल्याचा पवित्रा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. (वार्ताहर)डॉक्टर किंवा रुग्णालयाकडून वैद्यकीय उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला आहे का, याचा तपास करण्यासाठी प्रारंभी तज्ज्ञ समिती गठित करावी लागते. तज्ज्ञ समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई पोलिस यंत्रणेच्या अहवालाप्रमाणे करण्याचे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ मार्च २०१० रोजी काढलेल्या आदेशात सांगितले आहे. शिवाय, सर्वोच्च न्यायालयानेही असेच आदेश असल्यामुळे डॉ. अंजुम कादरी व एका परिचारिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी या संदर्भात चौकशी समिती गठित न करता व या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच गुन्हा दाखल केल्यामुळे हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
गुन्हा मागे घेण्यासाठी काम बंद आंदोलन
By admin | Updated: June 10, 2014 00:52 IST