मुखेड : तालुक्यात यंदा चांगला पावसाळा झालेला असताना व तलावांत भरपूर पाणी असूनसुद्धा ८५ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. असे चित्र पं़ स़ विभागाने तयार केलेल्या पाणीटंचाई आराखड्यावरून दिसून येत आहे़ तालुक्यातील खैरका, बावनवाडी ग्रामपंचायत येणार्या वाडी-तांड्यांवर डिसेंबरपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे डिसेंबरपासूनच टँकरची मागणी करण्यात आली होती़ हा तालुका डोंगराळ असून पाणी साठवण करण्याचे स्त्रोत अल्प असल्यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जाते़ यंदा पर्जन्यमान चांगले झाले असले तरी डोंगराळ भागात राहणार्या वाडी-तांड्याची संख्या जास्तीची आहे़ या माळरानावर असलेल्या वस्त्यात पाणीपुरवठा व्यवस्था पुरवण्यास प्रशासन, ग्रामपंचायत व पं़ स़ ला यश आले नाही. लाखो रुपये खर्चूनही कायमस्वरूपी योजना राबविण्यात आल्या नाहीत. यामुळे जास्तीचे पर्जन्यमान होवूनही तालुक्यात जानेवारीनंतर पाणीटंचाई जाणवू लागते़ यंदा तालुक्यासाठी १ कोटी ११ लाख १६ हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून जानेवारी २०१४ ते मार्च १४ साठी ७८ लाख २ हजारांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला होता़ तर एप्रिल ते जूनसाठी ६२ हजार ८८६ रुपयांचा आराखडा तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे़ या आराखड्यात ४८ नवीन विंधन विहिरी, २० नळयोजना दुरूस्ती, १६ पूरक नळयोजना, ७१ विंधन विहीर विशेष दुरूस्ती, ९१ विहीर अधिग्रहण, ७ विहिरी गाळ काढणे, ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता़ येवती, केरूर, तारदडवाडी, मंग्याळ, सावरगाव वाडी, राजुरा तांडा, गोजेगाव, दापका राजा, बोरगाव, भाटापूर (प़दे़), हिब्बट, इटग्याळ (प़मु़), शिकारा, भाटुतांडा, बेन्नाळ, खतगाव (प़दे़), हंगरगा (पक़़ं), मंचुतांडा, रत्नातांडा, धनज, सांगवी (भादेव), माकणी आदीसह ७१ गाव, वाडी-तांड्यावर पाणीटंचाई भासत असल्याने प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत. पंचायत समितीने बोअर, विहीर अधिग्रहणाचे ४५ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत़ तहसीलदार घोळवे यांनी केवळ १६ प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे सूर्यवंशी यांनी सांगितले़ ५ प्रस्तावांना मंजुरी द्यावी, की नाही यासाठी चौकशी सुरू आहे़ दरम्यान मे महिना संपण्यास केवळ चार दिवस असताना मागणी असलेल्या गावांच्या अधिग्रहणाच्या मागणीची चौकशी अद्यापपर्यंत करण्यात आली नसल्याने अनेक सरपंचांनी पंचायत समितीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे़ (वार्ताहर) ६ मे पासून सांगवी (बे़) ग्रामपंचायत अंतर्गत प्रभूतांडा, देवीनगर यांच्यासह जुन्ना व बावनवाडी ग्रामपंचायत अंतर्गत मानसिंग तांडा, लखुतांडा, सोनपेठवाडी तांडा, बावनवाडी, शिरूर दबडे ग्रा़पं़ अंतर्गत हरिचंद्र तांडा, सीताराम तांडा, फत्तू तांडा, कोळगाव ग्रा़ पं़, वाल्मिकनगर, विठ्ठलवाडी, दापका गुंडोपंत अंतर्गत यशवंतनगर व खैरगा ग्रामपंचायतीला ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या गावांना सहा टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने आणखी एक टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे़
मुखेडात पाणीटंचाई
By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST