लातूर : आर्थिक परिस्थिती कमकुवत... आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी जिद्द आणि मेहनत... सतत डोळ्यांसमोर आई-वडिलांचे काबाडकष्ट... स्वत:चीही मोलमजुरीची तयारी, अशा जिगरबाज आणि मेहनती असलेल्या जिल्ह्यातील दोन तरुणांनी आपले स्वप्न तर साकारलेच, सोबत आई-वडिलांच्याही कष्टाचे मोल केले. रेणापूर तालुक्यातील कोष्टगाव येथील पुंडलिक डाके अन् अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील नरहरी फड या दोन नूतन फौजदारांची ही यशोगाथा...घरच्या कोरडवाडू शेतीवर कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या वडिलांच्या कष्टाला फळ देताना प्रसंगी बड्या हॉटेलात रिसेप्शनिष्ठ तर कॉल सेंटरला बॅक आॅफीसमध्ये काम करुन अहमदपूर तालुक्यातील नरहरी फड नावाच्या तरुणाने फौजदार होण्याचा मान पटकाविला. विशेष म्हणजे अभ्यासाच्या ध्यासासाठी मी साधे माझे फेसबुक अकाऊंट उघडले नाही की मोबाईलवर व्हॉटस् अॅप् घेतले नाही. हे नसल्यामुळे अभ्यासावर केंद्रीत केलेल्या लक्ष्यानेच माझे लक्ष्य गाठून दिले, अशा प्रतिक्रिया नरहरी फड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केल्या. अत्यंत हलाखीत दहावीपर्यंत अहमदपुरात, कनिष्ठ महाविद्यालयीन अंबाजोगाईत तर पदवी कामे करुन पुण्यात शिकणाऱ्या नरहरींना २०११ पासून त्यांना स्पर्धा परिक्षेची ओढ लागली. मागच्या तीन वर्षात राज्य सेवेच्या तीन वेळा परीक्षा दिल्या. थोड्या - थोड्या गुणाने मिळणारी हूल मनाला आतल्या आत खायची. राज्य सेवेच्या अभ्यासाने लेखीचा गृहपाठ चांगला झाला होता. चिंता ग्राऊंडची होती. परंतु १०३ ला क्लोज झालेली पीएसआयची लेखी त्यांना १२२ गुण आणि ग्राऊंड ८२ गुणाचे दान देत यशाला गवसणी घालून गेली. मुलाने आमच्या कष्टाचे चीज केले, असे नरहरी यांचे वडील त्रिंबक फड म्हणाले. (प्रतिनिधी)रेणापूर तालुक्यातील कोष्टगाव येथील जगन्नाथ डाके यांना तीन मुलं पुंडलिक, अनिल आणि संदीप. दोन एकर कोरडवाहू शेतीवर आणि मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. मुलांनी शाळा शिकून नोकरी मिळवावी, असे स्वप्न त्यांचे होते. या स्वप्नाला पुंडलिकने आकार दिला आहे. आकलन, मनन, चिंतन आणि उपाययोजना या चतु:सूत्रीचा नियोजनबद्ध अवलंब करीत अभ्यास केल्याने लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत पुंडलिक उत्तीर्ण झाले.
आई-वडिलांच्या काबाड कष्टाचे केले मोल...
By admin | Updated: March 18, 2015 00:19 IST