संतोष धारासूरकर , जालना गेल्या निवडणुकीत अवघ्या ८ हजार ४८२ मतांनी विजय पटकाविलेल्या खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी तुल्यबळ लढतीच्या हवेत मोदींच्या त्सुनामी लाटेवर स्वार होत विरोधकांना पुन्हा ‘चकवा’ दिला. महायुतीचे खा. दानवे विरूद्ध काँग्रेस आघाडीचे विलास औताडे यांच्यातील लढत तुल्यबळ होईल, असे चित्र निर्माण झाले होते. विशेषत: तीन वेळा हॅटट्रीक केलेल्या दानवेंविरोधात आघाडीने संपूर्ण रणधुमाळीत अक्षरश: टीकेचे झोड उठविले. त्याव्दारे दानवेंना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले होते. त्यांच्या कार्यपद्धतीवर कडवट टीका करतेवेळी आघाडीने वैयक्तिक पातळीही गाठली. काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे दोन असे एकूण सहा आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या सत्तास्थानांच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या सक्षम असणार्या आघाडीने या निवडणुकीच्या माध्यमातून पंधरा वर्षापासूनचा राजकीय वनवास संपविण्याचा संकल्प सोडला होता. औताडेंचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन तर केलेच; आघाडी अंतर्गत ऐक्याचे दर्शनसुद्धा घडविले. विशेषत: तेथूनच दानवेंविरोधात पद्धतशीरपणे राळ उडविण्यास सुरूवात केली. वनवास संपवू असा संकल्प करणार्या या लोकप्रतिनिधींनी ‘आमच्यात मताधिक्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे,’ अशाही वल्गना केल्या. त्यामुळे आघाडीअंतर्गत पदाधिकार्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘कोरी पाटी’ असणारे औताडे गटबाजीच्या राजकारणात अडकणार नाहीत, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांत निर्माण झाला. शक्तीप्रदर्शनापासून दानवेंविरोधातील वातावरण आघाडीने पेटविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे स्टार प्रचारक खा. राहुल गांधी यांच्या जाहीर सभेतून आघाडीने पुन्हा शक्तिप्रदर्शन घडवून महायुतीत अस्वस्थता निर्माण केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून मोदींची सभा हवीच, असे महायुतीस वाटले खरे, परंतु मोदींची सभा मिळालीच नाही. मात्र, आपल्या विरोधातील नकारात्मक सूर मतपेटीतून उमटू नये म्हणून दानवेंनी जिवाचे रान केले. मोदी लाटेवर स्वार होण्याचा चंग बांधला. ‘होमपीच’ भोकरदनसह बदनापूर व पैठणवर लक्ष केंद्रित केले. फुलंब्री व सिल्लोडला आघाडीत सुरूंग लावला. अखेर शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाटेने हतबल झालेल्या आघाडीने दानवेंसमोर सपशेल शरणागती पत्करली. जिंकल्याचे कारण शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाट नियोजनबद्ध अशी प्रचारयंत्रणा रणधुमाळीतील फोडा-फोडीचे राजकारण २२ निवडणुकांचा भक्कम अनुभव हरल्याचे कारण शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाट आघाडीची ढिसाळ प्रचारयंत्रणा सत्तारूढ आमदारांचा फाजील आत्मविश्वास काँग्रेसविरोधी नकारात्मक सूराचा फटका या कारणांमुळे मिळाला विजय गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण देशभरात उसळलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेवर खा. रावसाहेब दानवे पाटील हे सहजपणे स्वार झाले. तीन वेळा हॅटट्रिक केलेल्या दानवेंविरोधात विरोधकांनी आळवलेला नकाराचा सूर लाटेत पार विरघळला. राजकीय आयुष्यात २२ वेळा निवडणुका लढविलेल्या व २१ निवडणुकांमधून यश पटकाविलेल्या दानवे यांनी या निवडणुकीत अनुभवाच्या भक्कम शिदोरीवरच विरोधकांना पुन्हा ‘चकवा’ दिला. २२ व्या वेळीही यश मिळविले. या मतदारसंघात राजकीयदृष्ट्या आघाडीचे प्रचंड प्राबल्य होते. काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे दोन आमदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसारखी सत्तास्थाने पाठीशी असतानासुद्धा आघाडीअंतर्गत लोकप्रतिनिधींसह पुढार्यांमधील ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ दानवेंच्या पथ्यावर पडला.
मोदी लाटेवर दानवे स्वार!
By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST