उस्मानाबाद : शाळा, महाविद्यालय परिसरात मोबाईल फोनच्या आवाजामुळे शैक्षणिक कार्यात व्यत्यय येतो. तसेच इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊनच शाळा, महाविद्यालय परिसर व वर्गामध्ये मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६९ टक्के विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात मोबाईल वापरीत असल्याची कबुली दिली आहे. या स्पर्धेत गुरुजी मंडळींही मागे राहिलेली नाही.शासनाच्या वतीने शाळा, महाविद्यालय परिसरात मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही सर्रास मोबाईल फोनचा वापर होताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांसोबतच गुरुजींनाही मोबाईलचा मोह आवरत नाही. या संदर्भातच लोकमतने सर्वेक्षण केले. प्रश्नावलीच्या स्वरुपात त्यांची मते जाणून घेतली. यावेळी ‘आपण शाळा, महाविद्यालयात मोबाईल वापरता का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ६९ टक्के विद्यार्थ्यांनी ‘हो’ असे मत नोंदविले. तर २५ टक्के विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरत नसल्याचे सांगितले. तर ६ टक्के विद्यार्थ्यांनी कधी तरी मोबाईल वापरतो असे सांगितले. शाळा-महाविद्यालयातील मोबाईल बंदीचा निर्र्णय आपणास योग्य वाटतो का? असा प्रश्न विचारला असता, ६३ टक्के लोकांनी हा निर्र्णय सर्वांच्याच हिताचा असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तर २ टक्के विद्यार्थ्यांनी सांगता येत नाही. या पर्यायावर शिक्कामोर्तब केले. ३५ टक्के विद्यार्थ्यांनी हा निर्र्णय योग्य वाटत नाही असे मत विषद केले. ‘आपल्या शाळा-महाविद्यालयात मोबाईलची सक्ती केली जाते का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ८ टक्के विद्यार्थ्यांनीच ‘हो’ असे मत नोंदविले. तर या निर्णयाच्या बाबतीत शाळा-महाविद्यालयच उदासिन असल्याचे ९० टक्के विद्यार्थ्यांनी मत नोंदविले, २ टक्के विद्यार्थ्यांनी ‘कधी तरी सक्ती करतात’ असे सांगितले आहे.मोबाईल वापरल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांवर कारवार्ई झाली का? असाही प्रश्न सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात आला होता. परंतु याचे निष्कर्षही चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. ८८ टक्के विद्यार्थ्यांनी काहीच कारवाई झाली नाही असे सांगितले तर १० टक्केच विद्यार्थी म्हणाले कारवाई होते. उर्वरित दोन टक्के विद्यार्थ्यांनी सांगता येत नाही, या पर्यायावर आपले मत नोंदविले. वर्ग शिक्षक, प्राध्यापक मोबाईल वापरतात का? असाही प्रश्नही यावेळी विद्यार्थ्यांना विचारण्यात आल्या होता. या प्रश्नाचे निष्कर्षही सर्वांनाचे विचार करायला लावणारे आहेत. ९३ टक्के विद्यार्थ्यांनी आमचे गुरुजी मोबाईल बंदीचे उल्लंघन करतात, असे स्पष्ट केले. तर २ टक्केच विद्यार्थी नाही असे म्हणाले. ५ टक्के विद्यार्थ्यांनी ‘कधी-कधी’ या पर्यायाला पसंती दिली. त्यामुळे आता गुरुजींनी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यापूर्वी स्वत:च मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. हेच लोकमतने कलेल्या सर्वेक्षणातून प्रकर्षाने समोर आले आहे. (प्रतिनिधी)मोबाईल व्यसनचशासनाने उदात्त हेतूने शाळा-महाविद्यालय परिसरात मोेबाईल वापरावर बंदी घातली आहे. मात्र ही बंदी केवळ कागदावरच आढळून आली. बहुतांश विद्यार्थी याकडे फारसे लक्ष देत नाहीत. हे एक प्रकारचे व्यसनच बनले आहे असे किशोर भांगे या विद्यार्थ्याने म्हटले. तर वर्गामध्ये शिक्षकच मोबाईल वापरतात. त्याचेच अनुकरण विद्यार्थी करतात, असे निलेश पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे नुकसानमोबाईलमुळे विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळही वाया जात आहे. एकवेळ शालेय साहित्य वेळेवर खरेदी करणार नाहीत, पण मोबाईलचे रिचार्ज मारतात. याचा परिणाम अभ्यासावरही होत आहे, असे राहुल कसबे याने सांगितले. महाविद्यालय-शाळा परिसरात मोबाईलवर बंदी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर मोबाईल वापराबाबत जनजागृती करण्याची गरज आनंद शिंदे यांनी व्यक्त केली. मोबाईल वापरणाऱ्यावर प्राचार्यांनी दंडात्मक कारवाई करावी, असे नानासाहेब भोसले याने सांगितले.
मोबाईल बंदी धाब्यावर !
By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST