औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वे गेल्या २५ वर्षांपासून मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे रेल्वे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे मराठवाडा विभाग मध्य रेल्वेशी जोडणे आवश्यक आहे. मराठी माणसाचे हित लक्षात घेऊन याकडे लक्ष घालून हा प्रश्न धसास लावावा, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीने सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी आपल्या स्टाईलने प्रश्नांसाठी प्रयत्न करण्यात येईल,असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, रशीदमामू, अभियंता सेनेचे अध्यक्ष प्रवीण जाधव आदी उपस्थित होते. वर्षानुवर्षे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न कायम आहेत. लोकप्रतिनिधी संसदेमध्ये या प्रश्नांवर चर्चा करतात; परंतु आजपर्यंत हे प्रश्न सुटलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तर ते वेळ देत नाहीत. त्यामुळे तुम्ही मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. रोटेगाव (वैजापूर)- कोपरगाव रेल्वेमार्ग, मनमाड-मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणासह दुहेरीकरण करणे, औरंगाबाद-दौलताबाद-खुलताबाद-कन्नड-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे काम रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र राज्य सरकार आणि नॅशनल हायवे या तिघांनी मिळून पूर्ण करणे आदी मागण्यांबाबत राज ठाकरेंना निवेदन देण्यात आले. रेल्वे पद्धतीने प्रयत्न करेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.