औरंगाबाद : कैलासनगर स्मशानभूमी रोडवरील घरे रस्त्यावरील अतिक्रमण ठरवून ती पाडण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. २०११ मध्ये महापालिकेने १८ मीटर रस्ता रुंद करण्यासाठी अनेक घरे पाडली. आता हा रस्ता २४ मीटर रुंद असल्याच्या नोटिसा दिल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले.
एमजीएम ते लक्ष्मण चावडीपर्यंत रस्ता तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हे काम सुरू आहे. रस्त्यातील काही मालमत्ता रुंदीकरणात जात आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत. शहर विकास आराखड्यानुसार रस्ता कुठे १८ मीटर, तर काही भागात २४ मीटर रुंद आहे. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली होती, तेव्हा कैलासनगरातील रस्ता रुंद करण्यात आला होता. अनेक नागरिकांची घरे पाडण्यात आली होती. महापालिकेने याचा मोबदलाही टीडीआर स्वरूपात दिला. आता महापालिकेने येथील ५० पेक्षा अधिक नागरिकांना महापालिका अधिनियम कलम २६० अन्वये नोटिसा दिल्या. या नोटीसमध्ये रस्ता २४ मीटर रुंद असल्याचे म्हटले आहे. आपल्या मालमत्ता का पाडण्यात येऊ नये, असे त्यात म्हटले आहे. यासंदर्भात आपले म्हणणे ८ ते १५ दिवसांत महापालिकेकडे दाखल करावे असे अतिक्रमण हटाव विभागाच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नोटिसा प्राप्त होताच परिसरात खळबळ उडाली. नऊ वर्षांपूर्वीच आमच्या मालमत्तांचा काही भाग महापालिकेने रुंदीकरणात घेतला. आता पुन्हा आम्हाला बेघर करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. महापालिकेने पूर्वी रस्ता रुंद करताना १८ मीटरनुसार पाडापाडी केली होती. आता २४ मीटर म्हटले तर अनेकांची पूर्ण घरेच यामध्ये जाणार आहेत.
मनपाने मोजणी करावी२०११ मध्ये मार्किंग करून रस्ता रुंदीकरण केले. नागरिकांनी मनपा प्रशासनाला तेव्हा सहकार्य केले. आता पुन्हा आचनक २४ मीटर रस्ता असल्याचे सांगून नोटीस दिल्याने आमची झोप उडाली आहे. आधीच कोरोनाने अनेकांचा रोजगार गेला. व्यवसाय ठप्प झाला. आता राहते घरही जाणार ही भीती भेडसावत आहे. प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरू नये.- बिपीन जावळे, नागरिक.
१८ आणि २४ मीटरचा वाद संपवाकैलासनगरातील गोरगरीब नागरिकांना नोटिसा दिल्या आहेत. मनपाने या भागात रस्ता नेमका १८ मीटर आहे का २४ मीटर हे निश्चित करावे. विनाकारण त्रास देऊ नये. यापूर्वी मनपाने अनेक गोरगरीब नागरिकांना बेघर केले. आता पुन्हा करू नये.भास्कर गिऱ्हे, नागरिक
मोजणी झालेली आहेरस्ता १८ मीटरपर्यंत कुठे आहे, पुढे २४ मीटर कुठे आहे, हे नगररचना विभागाने अलीकडेच मोजणी करून मार्किंगही केली आहे. अनेक नागरिकांनी मनपाला जागा हस्तांतरित केल्यावर पुन्हा अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने नोटिसा दिल्या. विनाकारण त्रास देण्याचा प्रश्नच येत नाही.- रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.