जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी रविवारी ९१ टक्के मतदान झाले. याची मतमोजणी मंगळवारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे लागले आहे. सर्वाधिक मतदान ग्रामपंचायत गटातून, तर सर्वात कमी मतदान हमाल-मापाडी गटातून झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत जालन्यासह बदनापूर तालुक्याचाही समावेश आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, काही मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाल्याने निवडणूक घेण्यात आली. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजुरेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि काँग्रेस, मनसे व शेतकरी संघटनेच्या शेतकरी बचाव पॅनलमध्ये मुख्य लढत होती. दोन्ही पॅनल प्रमुखांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. मंगळवारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी होणार असून, दक्षता म्हणून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
बाजार समितीसाठी आज मातमोजणी !
By admin | Updated: May 16, 2016 23:39 IST