औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांच्या वतीने ‘मराठवाड्याचा युवा वक्ता’ ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ५ जानेवारीपासून सुरू होत आहे. स्पर्धेचे यंदा ५ वे वर्ष असून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत या स्पर्धेच्या फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आ. सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जिल्हानिहाय आयोजित केलेल्या या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांची महाअंतिम फेरी १३ जानेवारी रोजी औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयात होईल.यंदा जिल्हानिहाय फेरीसाठी ‘भय इथले संपत नाही’, ‘नाही निर्मळ मन, काय करील स्वच्छता मिशन’, ‘सोशल मीडियाची ऐशी की तैशी’, ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला...’ हे चार विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण २४ विजेत्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी होईल. यासाठी ‘शरद पवार : काटेवाडी ते दिल्ली व्हाया मुंबई’, ‘अच्छे दिन : सत्य की आभास’, ‘मराठवाड्याची माती दुष्काळाने करपली’, ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे चार विषय ठेवण्यात आले आहेत. महाअंतिम फेरीतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे १५, १० व ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दिवशी एक तास अगोदर नोंदणी करता येईल.
मराठवाड्याचा युवा वक्ता स्पर्धा ५ जानेवारीला
By admin | Updated: December 28, 2014 01:26 IST