औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणूक विभागाने वॉर्ड रचना करताना आणि जातीनिहाय सोडत काढताना राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आदेश पाळले नाहीत. त्यामुळे २७ ठिकाणी नैसर्गिक हद्द ओलांडण्यात आली आहे. तर सातारा-देवळाई नगर परिषदेतील सुमारे १५ ते १८ हजार लोकसंख्या मनपा हद्दीत आली आहे. २००५ व २०१० साली झालेल्या निवडणुकीतील आरक्षणाच्या रोटेशनमध्ये घोळ केल्याचा आरोप नगरसेवक समीर राजूरकर, रवी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. आयोगाच्या आदेशाची पायमल्ली करीत मनपा अधिकाऱ्यांनी रोटेशन व वॉर्ड रचनेत केलेल्या उलथापालथींमुळे संशयास्पद अफवा शहरभर सुरू आहेत. सुनावणीतून न्याय मिळाला नाही, तर न्यायालयात जाऊ, असे राजूरकर म्हणाले.३ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या उपस्थितीत मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे २२० नागरिकांनी केलेल्या २९७ आक्षेपांवर सुनावणी सुरू होणार आहे. ३ मे २००५, १० जुलै २००९ आणि २ आॅगस्ट २०११ असे तीन परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले होते. त्याआधारे ७ फेबु्रवारी २०१५ रोजी सोडत झाली. जालना रोड ओलांडला...१७ वॉर्डांना राज्य महामार्ग क्र. ६ जालना रोडची हद्द आहे; पण कोकणवाडी वॉर्डाने कोटला कॉलनी जोडून हा रोड ओलांडला. सिल्लेखाना नैसर्गिक हद्द असताना वॉर्ड दुसरीकडे घुसविला. कोतवालपुरा या वॉर्डाने खाम नदीची हद्द ओलांडली. तसेच हा वॉर्ड आजवर आरक्षित राहिलेला आहे. यावेळी थेट आरक्षित होण्याचे कारण संशयास्पद आहे. तर १४ वॉर्डांच्या डी. पी. रोडच्या सीमा ओलांडल्या आहेत.
आयोगाचे आदेश मनपाने धुडकावले
By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST