भूम : मे महिना सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असून, जून महिन्यात मान्सून वेळेवर दाखल होईल, या आशेवर खरीप पेरणीपूर्व मशागतीही जवळपास पूर्ण केल्या आहेत. सध्या शेतकरी खते, बी-बियाणे यासाठी पैशांची जुळवाजुळव करीत असल्याचे दिसत आहे. तालुक्यात खरिपाचे ३८ हजार ८० हेक्टर सरासरी क्षेत्र असून, गतवर्षीच्या खरीप हंगामात ४६०० हेक्टरवर कापूस तर ६५०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. या दोन्ही पिकामधून चांगले उत्पादन झाल्याने यंदा कापसाचे क्षेत्र ९ हजार तर सोयाबीनचे ८५०० हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासाठी वेळेवर बी-बियाणे, खते मिळणे व पाऊस होणे गरजेचे आहे. दरम्यान, यंदा कापूस लागवडीसाठी सर्व कंपन्यांच्या बियाणांचे ३६ हजार पाकिटे मागविण्यात आले असून, याचा पुरवठाही सुरू असल्याचे पंचायत समिती कृषी विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, सोयाबीन बियाणाचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांना स्वत:च्या शेतातील बियाणाचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, सोयाबीन बियाणाची पेरणी करण्यापूर्वी शेतकर्यांनी त्याची घरच्याघरी उगवण क्षमता तपासून पहावी, असे आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आले आहे. यासाठी एका कुंडीत शंभर बिया टाकल्यानंतर ४८ तासात यार्पीिं ७० बिया उगवून आल्या तर एकरी २५ किलो बियाणे पेरणी करावे तर साठ बियाणांची उगवण झाल्यास ३० किलोची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (वार्ताहर) कृषी खात्याकडून तीन फेर्यांत मार्गदर्शन खरीप पेरणीपूर्व तयारीबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने तीन फेर्यात मार्गदर्शन करण्यात येत आहे. याला १२ मे पासून सुरूवात झाली असून, ६ जूनपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे. यात शेती पिकाची लागवड, पीक विमा, अंतरपीक पध्दती, घरगुती सोयाबीन बियाणाचा वापर, जैविक खतांचा वापर आदींबाबत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी हे गावागावात जावून मार्गदर्शन करीत आहेत. अशी आहे बियाणांची मागणी बाजरी १०५ क्विंटल, तूर ९०४ क्विंटल, मूग १८० क्विंटल, उडीद ५२५ क्विंटल, सोयाबीन ५५२५ क्विंटल, सूर्यफूल ३५० क्विंटल, कापूस ३६४०० क्विंटल. गुणवत्तापूर्व निविष्ट शेतकर्यांना मिळण्यासाठी तालुकस्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी राहणार आहेत. बियाणांचा काळा बाजार आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी अधिकारी संजीवन दराडे यांनी दिला. सतत हवामानात बदल होत असल्याने प्रत्येक शेतकर्यांनी लावलेली पिके विमा संरक्षित करावीत. तसेच पाऊसमान अनियमित असल्याने उताराला आडवी पेरणी करावी. यामुळे कमी पावसावर देखील उत्पादन चांगले उत्पादन मिळू शकेल.
पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात
By admin | Updated: May 18, 2014 00:49 IST