वाळूज महानगर : आखाती देशात चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४२ बेरोजगारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत उघडकीस आली आहे. चांगल्या नोकरीचे स्वप्न बघून गेलेल्या या बेरोजगारांना मुंबईहून रिकाम्या हाताने परतावे लागले.आकाश शर्मा याने बजाजनगरातील जागृत हनुमान मंदिराजवळ दोन महिन्यांपूर्वी साई इंटरनॅशनल सर्व्हिसेस या नावाचे कार्यालय सुरू केले होते. शर्मा याने बेरोजगार युवकांना आखाती देशातील कुवैत आॅटोमोटिव्ह इम्पोर्टस् या नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. व्हिसा व नोकरीसाठी ६० ते ८० हजार रुपयांची मागणी या शर्माने केली. अल्पावधीतच ४२ बेरोजगारांनी शर्माकडे पैसे जमा केले. त्याने या बेरोजगारांना कुवैत आॅटोमोटिव्ह इम्पोर्टस् या कंपनीचे कॉल लेटर देऊन त्यांना ३० तारखेला कुवैतचे विमान असल्याचे सांगून मुंबईला बोलावले.मुंबईतून एजंट फरारहे ४२ बेरोजगार २९ ला मुंबईला पोहोचल्यानंतर आकाशने त्यांची एका लॉजमध्ये थांबण्याची व्यवस्था केली. दरम्यान, पासपोर्टवर स्टॅम्प व स्वाक्षरी बाकी असल्याची थाप मारून तो लॉजमधून पसार झाला. निराश बेरोजगार परतलेया बेरोजगारांकडे व्हिसा नसल्यामुळे त्यांना विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारला. विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरच आकाशची वाट बघत बेरोजगार थांबले. ३० नोव्हेंबरला कुवैतकडे जाणाऱ्या विमानाने झेप घेऊनही आकाश न आल्यामुळे या बेरोजगारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मुंबईच्या सहारा पोलीस ठाण्यात जाऊन हा प्रकार सांगितला. मात्र, घटना औरंगाबादला घडल्याचे कारण दर्शवून मुंबईच्या पोलिसांनी त्यांना औरंगाबादला तक्रार देण्याचा सल्ला दिला. अखेर काल रात्री निराश अवस्थेत बेरोजगार वाळूज औद्योगिक परिसरात परतले. आज त्यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांची भेट घेतली. मोहंमद कमाल, असद अली, धरमनाथ गुप्ता, जोगेंदर राम, साबीर अली, मोहंमद फिरोज आलम, मोहंमद नदीम अन्वर, मोहंमद मुस्तकीम खान, मोहंमद शहेबाज आलम, राजेशकुमार सिंग, शैलेशकुमार सिंग, मोहंमद रब्बानी, हरिराम कुमार, रिजवान शेख, मोहंमद सिराय, मोहंमद ताहेर, मोहंमद सोहेल, साजीद आलम, सागर गुप्ता इ. जवळपास ४२ बेरोजगार युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करून आकाश शर्मा हा भामटा फरार झाला आहे.
आखाती देशात नोकरी देण्याचे आमिष
By admin | Updated: December 2, 2014 01:10 IST