गजेंद्र देशमुख , जालनामराठवाड्यात भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना मोंढ्यात दुष्काळी स्थितीच दाहकता वाढत आहे. पावसाने ओढ दिल्याने मोंढ्यात आवक मंदावली आहे. परिणामी अर्थकारणावर मोठा परिणाम होण्यासोबतच मजुरांच्या हाताला काम मिळणेही जिकिरीचे झाले आहे.पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. आहे तो माल मोंढ्यात विक्री करण्यास शेतकरी धजावत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एरवी मोंढा म्हटला की, शेतकऱ्यांची गर्दी, धान्य कोठे ठेवावे, काढावे यासाठी व्यापाऱ्यांसह हमालांसोबत होणारी हुज्जत अन् धान्य विक्रीतून मिळणारी चांगली रक्कम पाहून शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर दिसणारे समाधान सर्व काही अलबेल असल्याचे सांगून जाते. दुष्काळामुळे हे चित्र आता धूसर झाले आहे. मृग नक्षत्र लागताच पाऊस पडेल ही भरोसा कमी झाला आहे. परिणामी मोंढ्यातील एकूणच मोंढ्यांतील लाखोंचे व्यवहार आता हजारांत आले आहे.जालना बाजार समितीत गहू, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका, हरभरा, तूर तसेच इतर मालाची आवक होते. जालना मोंढ्यात स्वतंत्र बाजारपेठा असल्याने येथे होणारी आवक इतर मोंढ्यांच्या तुलनेत निश्चित जास्त आहे. परंतु दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळाच्या फेऱ्यामुळे ठप्प होत आहे. गतवर्षी व यंदाच्या आवकची तफावतीलमधील दरी जास्त नसली तरी आवक नसल्याने अर्थकारणावर परिणाम झाला आहे. मे २०१६ अखेर गहू १९६२, ज्वारी २६९३५, बाजरी ५०६२, मका १४९४८, हरभरा ३३४८, तूर ४३७६, सोयाबीन १७२३ क्विंटलची आवक झाली. आडत व्यापारी सुदर्शन भुंबर म्हणाले, दुष्काळ व पाऊस लांबल्याने मोंढ्यात शुकशुकाट आहे. किरकोळ स्वरूपाची आवक होत आहे. त्यामुळे अर्थकारणावर परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांसोबतच हमाल मापाडीही त्रस्त आहेत. मोठ्या पावसाची गरज आहे. आडत व्यापारी नारायण भातपखाले, अशोक राऊत, वामनराव जगताप, रमेश दानवे, विष्णू गायकवाड, कृष्णा पवार, रामसेठ पल्लोड, रमेश तोष्णीवाल, त्र्यंबक जावळे आदी व्यापाऱ्यांनीही दुष्काळाची चिंता व्यक्त करून आवक मंदावल्याचे सांगितले.
जालना बाजारपेठेतील आवक मंदावली
By admin | Updated: June 17, 2016 00:28 IST