हिंगोली : एका कंपनीची खोटी जाहिरात करून गुंतवणूकदारांनी दामदुप्पट योजनेत भरलेले १७ लाख १० हजार रुपये गायब करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशाप्रकारे फसवणूक झालेल्या तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.याबाबत शेषराव अर्जुनराव चाटसे (वय ३५, रा. जिजामातानगर, हिंगोली) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरुन आरोपी श्रावण गणपत माने, सविता श्रावण माने (दोघे रा. प्लॉट नं. ०१, गंगा बिल्डिंग को- आॅपरेटिव्ह सोसायटी, आनंद पार्कजवळ, ठाणे) यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ भादंविनुसार हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा फसवणुकीचा प्रकार मागील सहा वर्षापासून ६ मे २०१४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमुद आहे. त्या दोघांनी कंपनीबाबत खोटी जाहिरात केली. गुंतवणुकदारांनी सदर कंपनीत पैसे गुंतवले. दुप्पट रक्कम तीन वर्षे व सहा वर्षाच्या मुदतीनंतर देणे असल्याने पैशांऐवजी त्यांनी शेषराव चाटसे व इतर गुंतवणूकदारांना धनादेश दिले होते. धनादेश देणाऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम शिल्लकच नसल्याचे उघडकिस आले. त्यामुळे त्या दोघांनी अन्यायाने विश्वासघात करून फसवणूक केल्याची तक्रार चाटसे यांनी पोलिसांत दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सतीश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)
गुंतवणूकदारांना १७ लाखांस गंडविले
By admin | Updated: July 12, 2014 00:47 IST