परभणी : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात विविध लेखाशिर्षाखाली अंदाजपत्रकीय रक्कमेत वाढ करुन साडे तीन कोटी रुपयांचा अपहार केल्या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ एप्रिल रोजी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली असल्याचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.परभणी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात भारतनिर्माण योजनेअंतर्गत प्रदूषित स्त्रोत असलेल्या गुणवत्ताबाधित गावांच्या अंदाजपत्रकीय ६ कोटी ४८ लाख ३४ हजार रुपयांच्या रक्कमेस शासनाची मंजुरी असताना योजना राबविताना जि.प.स्तरावर अंदाजपत्रकीय रक्कमेत ३ कोटी ५१ हजार ६६ हजार ६३३ रुपये वाढ करुन ती रक्कम कंत्राटदार व इतरांना प्रदान करण्यात आली व रक्कमेचा अपहार करण्यात आला. ही बाब २०१०-११ च्या वित्तीय लेखापरिक्षणात उघडकीस आली. या संदर्भात मराठवाडा जनता विकास परिषदेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही केली होती. या पार्श्वभूमीवर आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित केली होती. १३ एप्रिल रोजी ही लक्षवेधी चर्चेला आली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले असून त्यामध्ये पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकीय रक्कमेत वाढ करुन ती रक्कम कंत्राटदार व इतरांना प्रदान करुन कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी संगनमताने आर्थिक घोटाळा केल्या प्रकरणात चौकशी करण्याचा मराठवाडा जनता विकास परिषदेचा अर्ज १७ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याची प्राथमिक चौकशी सुरु आहे, असे ही लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
साडे तीन कोटींच्या घोटाळ्याची चौकशी
By admin | Updated: April 16, 2016 01:40 IST