अभिमन्यू कांबळे, हिंगोली लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्याने आता विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय पक्ष व इच्छुकांना लागले असून, त्या दृष्टिकोणातून हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचा उमेदवार निश्चित असला तरी भाजपामध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा वाढल्याने या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते? याकडे आघाडीतील नेत्यांचे लक्ष लागले आहे. हिंगोली विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सलग तीन वेळा विजय मिळविला आहे. चौथ्यांदा विजश्री संपादन करण्यासाठी आ. गोरेगावकर पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. दुसरीकडे शिवसेना-भाजपातील जागा वाटपाप्रमाणे हिंगोलीची जागा भाजपाकडे असून, गेल्यावेळी येथून तान्हाजी मुटकुळे यांनी आ. गोरेगावकर यांना कडवी झुंज दिली होती. त्यावेळी मुटकुळे यांना महायुतीतील नेत्यांनीच दगाफटा केल्याने निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता भाजपामधील परिस्थिती बदलली आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्याने मुटकुळेही अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे मित्र डॉ. पुंजाजी गाडे, मुळचे हिंगोली येथील रहिवासी असलेले व सध्या औरंगाबाद येथील व्यावसायिक मनोज जैैन हेही विधानसभा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल, यावर या मतदार संघातील निवडणुकीचे बरेच गणित अवलंबून राहणार आहे. हिंगोलीची उमेदवारी देण्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आतापर्यंत महत्वाची भूमिका होती. त्यांच्या पश्चात आता ही जबाबदारी कोणाकडे राहणार? याच्याकडेही जिल्ह्यातील भाजपा नेत्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडून आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याचे निश्चित आहे. राज्यस्तरावर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली तरी हिंगोलीत मात्र या दोन्ही पक्षांमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत. त्यामुळे आ. गोरेगावकर यांच्या अडचणी वाढणार आहेत. या विधानसभा मतदारसंघात खा. राजीव सातव यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आघाडी व महायुतीतील नेत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच मनसेकडून ओम कोटकर इच्छुक आहेत. माजी आ. साहेबराव पाटील हे या निवडणुकीत पुन्हा एकदा उतरणार की नाही? यावरही आ.गोरेगावकर यांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
भाजपाच्या हिंगोलीतील उमेदवारीबाबत उत्सुकता
By admin | Updated: June 10, 2014 00:17 IST