लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरा नदीवरील पुलासह शहरातील वाहतूक सुरू असलेल्या मार्गांची व बायपासची पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पाहणी केली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हलकी वाहने या पुलावरून सोडणेबाबत प्रस्ताव पाठवून पर्यायी रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंंह, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यासह आयआरबी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामर्गावरील बार्शी नाका भागात बिंदुसरा नदीवरील जूना पुल धोकादायक बनला आहे. त्यामुळे तो मागील अनेक महिन्यांपासून वाहतुकीस बंद केला. त्यानंतर पर्यायी मार्ग बनविला. तोही नुकत्याच झालेल्या पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक शहरातून व बायपास वळविण्यात आली. अवजड वाहने मांजरसुंबा, गढी मार्गे वळविण्यात आली. दरम्यान, शहरातून वाहतूक वळविल्यामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत असून वाहतूक कोंडीही होत आहे. तसेच छोट्या वाहनधारकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर अनेकांनी याबाबत पत्रकाबाजी, आंदोलने केली. परंतु ठोस असे काहीच अश्वासन प्रशासनाकडून मिळाले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
पूल, वळण रस्त्याची पालकमंत्र्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:07 IST