औरंगाबाद : महापालिकेच्या मुकुंदवाडी येथील शाळेने ‘आयएसओ’च्या नावावर गैरव्यवहार केल्याचा आरोप नगरसेवक कमलाकर जगताप यांनी थेट मनपा आयुक्तांकडे केला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्याध्यापक साळुंखे यांनी शाळेचा पदभार घेतल्यापासून शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. आयएसओच्या नावाखाली शाळेला मिळणाऱ्या निधीचा गैरव्यवहार केला आहे. आयएसओसाठी किती निधी जमा केला व किती खर्च केला, त्यासाठी शालेय समितीची मंजुरी घेतली का, या मुद्यांवर चौकशी करण्यात यावी, शाळेतील असभ्य वर्तनाच्या त्यांच्या विरोधात तक्रारी असून, साळुंखे यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शाळेतून संगणक चोरीला गेले होते. मात्र, याप्रकरणी साधी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. यासंदर्भात मुख्याध्यापक साळुंखे यांनी नमूद केले की, दोन वर्षांपासून शाळेचा पदभार आपल्याकडे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती चांगली आहे. आयएसओ मिळावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. दरम्यान, उपायुक्त रवींद्र निकम यांनी याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
‘आयएसओ’ च्या नावाखाली गैरव्यवहार
By admin | Updated: December 24, 2015 00:02 IST