बीड : सध्याचे युग आधुनिक ज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. नव्या ज्ञानाला संशोधनाची जोड दिली तर राष्ट्रीय विकास अधिक गतीमानशील होऊ शकेल. तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा शोध घेतला तर एक नवे संशोधन होऊ शकते, असा विश्वास ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केला. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व कै. अण्णासाहेब पाटील शिक्षण संस्था चांदेगावच्या वतीने ‘आदर्श शिक्षक प्रणाली’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिप्र संस्थेचे प्रा. सतीश पत्की तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर उपस्थित होते. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, महामंडळाचे विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, जिल्हा समन्वयक गजानन कुलथे यांची उपस्थिती होती. सावंत पुढे म्हणाले, पुस्तक, विषय, मूल्यमापन, गुणवत्ता ही माध्यमाशी केंद्रीत शिक्षण प्रणाली असून, समाज, विद्यार्थी आणि पर्यावरण केंद्रीय शिक्षण प्रणाली असणे गरजेचे आहे. शिक्षणाधिकारी हिंगोणेकर म्हणाले, शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प शिक्षण खात्याने घेतला आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रास्ताविक भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशीद तर आभार विलास यादव यांनी मानले. यशस्वीतेसाठी महामंडळाचे व कै.अण्णासाहेब पाटील शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)
‘ज्ञानाला संशोधनाची जोड दिल्यास विकास साध्य’
By admin | Updated: September 13, 2015 00:07 IST