औरंगाबाद : मुलाला चापट मारल्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर एका तरुणाने घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी आसेफिया कॉलनीत घडली.शेख रफिक शेख शमशू (३१, रा. आसेफिया कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, शेख रफिक आज सकाळी घरात होता. त्यावेळी त्याच्या लहान मुलाने बादलीतील पाणी सांडले. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने मुलाला चापट मारली. आपल्या लाडक्या मुलाला चापट मारल्याचा रफिकला राग आला. तू त्याला का मारले? असा त्याने पत्नीला जाब विचारला. त्यातून या पती- पत्नीत जोरदार वाद झाला. भांडणानंतर पत्नी रागारागाने घरातून निघून गेली. त्यानंतर रागात असलेल्या रफिकने छताला दोरी बांधून फाशी घेतली. हा प्रकार शेजाऱ्याच्या लक्षात आला. त्याने रफिकला तातडीने फासावरून उतरविले आणि उपचारासाठी घाटीत आणले; परंतु तोपर्यंत रफिकचा मृत्यू झाला होता. या घटनेची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
पत्नीशी भांडणानंतर पतीची आत्महत्या
By admin | Updated: July 6, 2014 00:35 IST