भूम : दोन वर्षापूर्वी ट्रान्सफार्मर मंजूर होवूनही तो अद्याप बसविण्यात आलेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने गणेगाव ग्रामस्थांच्या वतीने वीज कंपनी कार्यालयासमोर मंगळवारी उपोषण करण्यात आले.भूम तालुक्यातील गणेगाव येथील एकाच ट्रान्सफार्मवर क्षमतेपेक्षा अधिक कनेक्शन असल्याने सदरील ट्रान्सफार्मवरही मोठ्या प्रमाणात ताण येत असे. परिणामी सर्वच ग्राहकांना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे कृषीपंपही सातत्याने बंद रहात असत. हा प्रश्न लक्षात घेवून ३० डिसेंबर २०१४ मध्ये विद्युत ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आला. सदरील ट्रान्सफार्मर तातडीने बसविणे आवश्यक होते. परंतु, दोन वर्षांनंतरही ट्रान्सफार्मर बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे टोमॅटो द्राक्ष, टरबुज, कांदा आदी पिके पाण्याअभावी जळून गेली. वारंवार पाठुपरावा करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी उपोषण सुरू केले. या आंदोलनामध्ये रामदास उद्धव मोरे, नानासाहेब किसन मोरे, भाऊसाहेब मोरे, श्रीमंत नरसिंग मोरे, दादासाहेब शंकर वाघमारे, विश्वनाथ फरताडे, शौकत शेख आदी शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, एक महिन्याच्या आता ट्रान्सफार्मर बसविण्यात येईल, अशी ग्वाही कनिष्ठ अभियंता ए.ए. बचटू यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
ट्रान्सफार्मरसाठी ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 00:54 IST