औरंगाबाद : ५० वऱ्हाडींच्या साक्षीने लग्न लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी प्रथम मंगल कार्यालयाचे अर्ज, नंतर महानगरपालिकेची परवानगी व त्यानंतर पोलीस विभागाची परवानगी घ्यावी लागत आहे. या प्रशासकीय परवानग्या मिळविताना वर,वधू पित्यांची दमछाक होत आहे. यामुळे ‘लग्न बघावे करून’ या म्हणीची प्रचिती येत आहे.
लग्न समारंभासाठी बुकिंग केलेल्या मंगल कार्यालयाचा अर्ज घेऊन महापालिकेच्या झोनल अधिकाऱ्यांकडे जावे लागते. तिथे वधू- वर यांचा जन्माचा दाखला किंवा टीसी द्यावी लागते. सोबत आधारकार्ड, रहिवासी पुरावा जोडावा लागतो व मनपाचा अर्ज भरून द्यावा लागतो.
महानगरपालिकेची परवानगी मिळाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागतो. तिथेही मनपात दिलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतात. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वर,वधू येणार असतील त्या पोलीस ठाण्याचीही ना हरकत घ्यावी लागते.पोलीस ठाण्याची ना हरकत घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात जावे लागते. पुढे आयुक्तालयाच्या विशेष शाखेतून परवानगी देण्यात येते. लग्नाचे तयारीत व्यस्त असणाऱ्या वधू-वराच्या कुटुंबीयांना या सर्व प्रक्रियेतून जाताना अक्षरश: दमछाक होत आहे. कारण लग्नाच्या तयारीपेक्षा परवानगीसाठी जास्त वेळ जात असल्याचे काही वधू व वर पित्यांनी सांगितले. लग्नाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना लागू करावी अशी मागणी केली जात आहे. शहरात शेकडो लोकांच्या उपस्थितीत दररोज होणारे राजकीय समारंभ ,आंदोलने या पार्श्वभूमीवर लग्नासाठीच जास्त अटी असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.
चौकट
१.लग्न समारंभासाठी विशेष बाब म्हणून परवानगी
२. राज्यात प्रवासासाठी पास बंद करण्यात आले असले तरी परवानगीमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी
प्रवास परवाना व कोविड नसल्याच्या प्रमाणपत्राची अट
३. महापालिकेकडून ५० तर पोलिसांकडून ४५ व्यक्तींना समारंभात उपस्थितीची परवानगी.
४. याचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था व समूहाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व आमपीसी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
५. परवानगीसाठी एक खिडकी योजना अंमलात आणण्याची मागणी.