बीड : गुरूवार पाठोपाठ शुक्रवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे नुकसानीत भरच पडली असून, गारांच्या माऱ्याने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग १५ मिनिटे ठप्प होता. उन्हाळी पिकांनाही फटका बसला आहे.गुरूवारी रात्री नऊ वाजता बीडसह काही तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात गरमी निर्माण झाली होती. आकाशात दाटून आलेले ढग सायंकाळी साडेपाच नंतर कोसळले. बीडमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. चाकरमान्यांचे हाल झाले. पावसानंतर वातावरणात थंडावा निर्माण झाला.माजलगाव शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने पाठ फिरवली. गेवराईमध्ये साडेपाच वाजता वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. शहर परिसरातील काही घरांवरील पत्रेही उडून गेली. धारूर, शिरूर, परळीमध्ये पाऊस झाला. या पावसाने शहरातील नाल्या, रस्ते जलमय झाले होते. आष्टी तालुक्यात दादेगाव, घाटापिंप्री परिसरात कांद्याची काढणी सुरू आहे. अशातच अवकाळीने हजेरी लावल्यामुळे कांदा पावसात भिजला आहे. अंबाजोगाईत मात्र पाऊस झाला नाही. (प्रतिनिधी)
पुन्हा गारांचा मारा!
By admin | Updated: April 11, 2015 00:21 IST