लातूर : नवजात बालकांमध्ये हृदयरोग असण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र योग्यवेळी उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे बालरोग तज्ज्ञांनी पालकांमध्ये योग्यवेळी उपचाराबाबत जनजागृती केली पाहिजे, असे मत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भरत दळवी यांनी येथे व्यक्त केले. भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना लातूर शाखेच्या वतीने ‘बाल हृदयरोग’ या विषयावर लातुरात रविवारी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. दळवी म्हणाले, हृदयरोगावरील उपचारासाठी अधिक खर्च येतो. मात्र पालकांना शासनाच्या विविध योजनांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात उपचार घेणे आता शक्य झाले आहे. नवजात बालकांतील हृदयरोग ९० टक्के पूर्ण बरा होतो. मात्र त्याला तातडीने योग्य उपचार मिळाले पाहिजेत, असेही ते म्हणाले. कार्यशाळेला डॉ.के. शिवप्रकाश, डॉ. ओमप्रकाश जमादार, बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. इंद्रजित लकडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेला बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यांतील १४० डॉक्टर्स उपस्थित होते. (प्रतिनिधी)लातुरातील बालरोग तज्ज्ञ डॉ.एस.एच. भट्टड, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. गिरीश मैंदरकर, डॉ. नीता मस्के, डॉ. महेश सोनार, डॉ. दीपा दाडगे, डॉ. दीपिका भोसले, डॉ. महेश हलगे, डॉ. संतोष बजाज यांच्यासह बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळेत उपस्थिती दर्शविली.
नवजात बालकांमध्येही हृदयरोग वाढतोय्
By admin | Updated: May 18, 2015 00:20 IST