औरंगाबाद : सातारा- देवळाई न.प.च्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी आलोकनगरात गट नं. १५३ मधील इमारतीचे दोन मजले, तर छत्रपतीनगरातील गट नं. १३७ मधील इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब खिळखिळे केले. पंधरा दिवसांत ३० कामांवर अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई केली आहे. गट नं. १५३ मधील अभिजित येवले व गट नं. १३७ मधील भूषण गायकवाड यांच्या प्लॉट ४२ मधील पाच मजली इमारतीवरील दोन मजले चार ब्रेकर आणि ४४ हातोड्यांच्या माऱ्याने खिळखिळे केले आहेत. कारवाई सुरू असताना पथकाला पाहून अनेक जण स्वत:हून बांधकाम काढून घेण्याचे नाटक करीत आहेत, तर कोर्टाच्या ‘जैसे थे’च्या आदेशाच्या नावाखालीही पथकासमोर ‘भुलभुलैया’ उभा केला जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. २५ पैकी किती लोकांनी १० लाख भरले आहेत, अशी विचारणा केली असता, फक्त ९ लोकांनीच पैसे भरले असल्याचे समजले. उर्वरित याचिकाकर्त्यांना दुपारपर्यंतची मुदत दिली असून, त्यावर कोर्ट दुपारनंतर काय निर्णय घेते याकडे सातारावासीयांचे लक्ष लागून होते.सातारा, देवळाई परिसरात ३५० जणांना नोटिसा देऊनही गुरुवारपर्यंत फक्त ९ लोकांनीच दहा लाख रुपये जमा केले होते, त्यांच्याकडून अजून कागदपत्रांची सविस्तर माहितीही मागितली असून, परवानगी तपासण्यात येणार असल्याचे समजते. उर्वरित अतिरिक्त बांधकामांवर अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई चालू राहणार आहे. एफएसआयचा नियम धुडकावून लावीत नागरिकांचा जीव धोक्यात घालून सदनिका विकण्याचा घाटही बिल्डरांनी लावलेला आहे. जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्या आणि त्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या इमारतींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अचानक एखाद्या इमारतीत आग लागल्यास त्या ठिकाणी अग्निशामक विभागाची गाडी जाईल कशी, असा सुरक्षिततेचा विषय समोर आहे, असे प्रशासक विजय राऊत, मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी सांगितले.
दोन इमारतींच्या स्लॅबवर हातोड्यांचे घाव
By admin | Updated: December 19, 2014 01:02 IST