व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. ७ जूननंतर पाऊस पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी आहेत; मात्र आता तर पिण्याचे पाणीदेखील जिल्ह्यातील प्रकल्पात शिल्लक नाही. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार केवळ ०.५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यात २ मोठ्या प्रकल्पांसह एकूण १४२ सिंचन प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये माजलगाव बॅक वॉटर व मांजरा प्रकल्पाचा समावेश आहे. यातील माजलगाव प्रकल्पात ४० द.ल.घ.मी. पाणी साठा शिल्लक आहे. याच पाण्यावर बीड शहरातील पाणीपुरवठ्याची मदार असून, हे पाणी जूनअखेरपर्यंतच पुरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मांजरा प्रकल्पात पाण्याचा टिपूसही शिल्लक नाही. या ठिकाणी काही सामाजिक संस्था व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात १० मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये ६.३७ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे, तर लघु प्रकल्प १११ आहेत. यामध्ये परळी विभागात असलेल्या एकूण प्रकल्पात १.६ द.ल.घ.मी. पाणी आहे. हे पाणीही उपयुक्त साठ्यापेक्षा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. ७ जूननंतर पाऊस पडेल व सिंचन प्रकल्पांत थोडेफार पाणी येईल अशी अपेक्षा होती; मात्र पाऊस लांबणीवर पडत असल्याने पिण्याच्या पाण्याचे वांधे झाले आहेत.प्रशासनाकडे टंचाई काळातील आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या तरी उपाययोजना असल्याचे पाहावयास मिळत नाही. यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचे अधिकच दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता आहे.धारूर व केज शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार असलेल्या कुंडलिका धरणात केवळ १७ दलघमी पाणी शिल्लक असून यापैकी ८ दलघमी पाणीच पिण्यासाठी उचलता येऊ शकते. केज व धारूर शहराला सध्या कुंडलिका धरणावरून टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.अंबाजोगाई शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे काळवटी धरण कोरडेठाक पडले आहे. अधिग्रहीत केलेल्या काही उदभवावरच अंबाजोगाईची पिण्याच्या पाण्याची मदार आहे.
अर्धा टक्काच पाणीसाठा !
By admin | Updated: June 18, 2016 01:00 IST