औंढा नागनाथ : तालुक्यातील रुपूर येथील गट क्र १११ व ५७ मधील गायरान जमिनीपैकी ५५ हेक्टर क्षेत्राची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान या प्रकरणात २४ नव्हे तर एकूण ४१ फेर तोतया शेतकऱ्यांच्या नावे घेण्यात आले असून यातील आणखी हेराफेरीचा नवा प्रकार समोर आला आहे. रुपूर येथे गट क्र १११ व ५७ मध्ये मोठ्या प्रमाणात गायरान जमीन आहे. यातील १७६.७६ हेक्टर मधून ४६ शेतकऱ्यांना कायद्यानुसार जमिनीचे वाटप करण्यात आले. परंतु या ठिकाणी २४ तोतया शेतकऱ्यांची नावे तलाठ्याने संगनमत करुन १९८३ च्या महसूल रेकॉर्डमध्ये फेरबदल करुन चुकीच्या नोंदी घेतल्या. तसेच सदर गायरान जमीन त्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा उताऱ्यावर लावली असल्याची बाब उघडकीस आली आहे. या मध्ये आणखी १७ बोगस शेतकऱ्यांचे फेर सात बारावर घेतल्याचे आढळून आले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी सुमारे ४० एकर जमीन आपल्या नावे करुन घेतली आहे. तसेच १९८३ मध्ये ज्या व्याक्ती गावात नव्हत्या, २००३ मध्ये रुपूरचे रहिवासी झाले. त्यांची नावे ही जून्या रेकॉर्डला चूकीच्या पध्दतीने दाखवून मंडळ अधिकाऱ्यां मार्फत फेर घेण्यात आले आहे. याबाबत मूळ गायरानधारक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांना निवेदन दिले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून चुकीचे घेतलेले फेर रद करण्यास सांगितले असल्याचे समजते. दरम्यान यात वन विभागाची मोठी जमीन असल्याने त्यांनी ही हे फेर रद्द करण्यासाठी वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपिल केले आहे. विजेच्या धक्क्याने मृत्यूपहेणी : हिंगोली तालुक्यातील पहेणी शिवारात विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्यासुमारास घडली. मयताचे नाव जगन एकनाथ करंडे (वय ३५) असे आहे. बुधवारी सकाळी तो शेताकडे जात असताना रस्त्यालगतच्या विद्युतरोहित्राचा त्यास धक्का लागला. गावात बद्रीनाथ घोंगडे, महादु इंगोले, केशव शेवाळे, रंगनाथ घोंगडे यांनी त्याला दवाखान्यात नेले. दरम्यान डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. (वार्ताहर)
गायरान जमिनीच्या चौकशीचे आदेश
By admin | Updated: September 26, 2014 00:37 IST