राजूर : चांदई ठोंबरी येथे भीषण पाणी समस्या निर्माण झाली असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे. गांवकऱ्यांच्या पाणी समस्येकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. तातडीने गांवच्या पाण्याची समस्या सोडवण्यात यावी, नसता तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे. याविषयी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, चांदई ठोंबरी गावासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहे. परंतू ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या दोन महिन्यापासून ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहे. गावाला महात्मा गांधी तंटामुक्त व स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळविलेला आहे. तसेच गांवची वसुली सुध्दा शंभर टक्के आहे. मात्र सरपंच व ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारामुळे गावकऱ्यांना मुलभूत सोयीपासून वंचित राहावे लागत आहे. गावात पाणी समस्येसह नाल्या सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच ग्रामसेविका पंधरा दिवसांपासून गांवात येत नसल्याने सामान्य जनतेच्या कामाची अडवणूक होत आहे. विशेष म्हणजे ग्रामसेविका काळपांडे या १ मे महाराष्ट्र दिनी सुध्दा गैरहजर होत्या. याप्रकरणाची चौकशी करून ग्रामस्थांच्या पाण्याची सोय करण्यात यावी, नसता २८ मे पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर शेख नजीर शेख करीम, नारायण ठोंबरे, डिगांबर शेजूळ, शांतीलाल राजपूत, उत्तम रावळकर, विष्णू कदम, भगवान रावळकर, परमेश्वर ठोंबरे, कृष्णा कदम, विष्णू ठोंबरे, भाऊसाहेब ठोेंबरे, नंदकिशोर कदम, रामनाथ हराळकर, शामराव कदम, विठ्ठल भाग्यवंत, बाबू ठोंबरे, मधूकर आदबने, गजानन अहिले, संजू कदम, जगन ठोबरे, सुभाष ठोंबरे, महादू ठोंबरे, लिंंबा कदम यांच्यासह ३५ जणांच्या सह्या आहेत.
चांधई ठोंबरीत भीषण पाणी समस्या
By admin | Updated: May 27, 2015 00:38 IST