विनोद जाधव , लासूर स्टेशनशालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या सरासरी दहा टक्के असावे, त्याकरिता राज्यस्तरीय नियोजन करण्यात आले आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शाळेत पिण्याचे पाणीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच किलोभर वजनाची पाण्याची बाटली सोबत घेऊन शाळा गाठावी लागत आहे. ‘शासनाने काढलेले वजन दुष्काळाने पुन्हा लादले’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दप्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या वीस ते तीस टक्के असल्याचे निदर्शनास आले होते. या अतिरिक्त वजनामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात, असे तज्ज्ञांच्या अहवालावरून स्पष्ट झाले. ‘हे विद्यार्थी की ओझे वाहणारे हमाल’ अशी हेटाळणीही केली जात होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाच्या दहा टक्के करण्यासाठी शासनाने राज्यस्तरावर अंमलबजावणी सुरू केली आहे.पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वजन वीस किलोपेक्षा जास्त व बेचाळीस किलोपर्यंत असते. याप्रमाणे दप्तराचे वजन दोन किलो ते सव्वा चार किलो अपेक्षित आहे. सहा ते सात तास शाळेत विद्यार्थ्यांना बसावे लागते, त्यावेळेस त्यांना या ऋतूत किमान एक लिटर पाण्याची गरज असते, असे तज्ज्ञ डॉ. गणेश डोईफोडे यांनी सांगितले. ही गरज भागविण्यासाठी शाळेत पाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरातील अनेक शाळांत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच एक किलो वजनाच्या पाण्याच्या बाटलीचे ओझे घेऊन शाळा गाठावी लागत आहे. यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.लासूर स्टेशन येथील न्यू हायस्कूल शाळेत ८७० विद्यार्थ्यांपैकी ३०० विद्यार्थी पंचक्रोशीतील गावातून किमान १० किलोमीटर अंतराहून येतात. स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा त्यांना वजनाचा जास्त त्रास होतो. मुख्याध्यापक कहाटे यांनी सांगितले की, शाळेत पाणी उपलब्ध असल्यास घरून पाणी आणण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पाण्याचे वजन कमी होईल. सिद्धनाथ वाडगाव येथील न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक पटारे यांनी आॅगस्ट महिन्यात ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच गेल्या वर्षी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती; परंतु अद्यापही शाळेला पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागते, तर पोषण आहारासाठी पाणी विकत घ्यावे लागते, असेही त्यांनी सांगितले.
शासनाने काढले अन् दुष्काळाने लादले
By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST