अलिबाग : गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर जिल्ह्यात कायम असून, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १९२ मि.मी. पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. तर शनिवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या केवळ सहा तासांत अलिबाग येथे १४५ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.रायगड जिल्ह्यात याच २४ तासांत जिल्ह्यात एकूण १,६९७.९० मि.मी. पाऊस झाला असून, हे सरासरी पर्जन्यमान १०६.१२ मि.मी. आहे. रायगड जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी रोहा १३५, पेण १३५, अलिबाग १३४, सुधागड १३०, माणगांव १२५, श्रीवर्धन ११२, तळा १०७, मुरु ड १०५, महाड १०५, उरण १०२, खालापूर ८३, पनवेल ८०.४०, पोलादपूर ५९, माथेरान ४९, कर्जत ४४.५० मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.आपत्ती निवारण सज्जगेल्या ७२ तासांपासून रायगड जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाचे सातत्य असेच कायम राहिल्यास जलपातळी पूररेषेस पार करण्याची शक्यता विचारात घेऊन रायगड जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाने सतर्कता आदेश दिले असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.अलिबाग शहरास पावसाने काढले झोडपून अलिबाग शहरास पावसाने अक्षरश: झोडपून काढले. शहरातील तळकरनगर, तिवारी हॉस्पिटल, सार्वजनिक व्यायामशाळा परिसर, रोहिदास नगर, चेंढरे आदी परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकला नाही. परिणामी परिसरातील घरांच्या तळमजल्यांमध्ये पाणी घुसून आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच शहरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दरम्यान, अलिबाग-पेण मार्गावरील तीनवीरा धरण भरून वाहू लागले आहे.जुनाट वृक्ष बाजूला करताना हायड्राही कलंडलामोहोपाडा : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रसायनीकरांना चांगलेच झोडपून काढले. मोहोपाडा एमआयडीसी रिलायन्स कॉलनीलगत वळणावरील जुनाट वृक्ष उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. शिवनेरी वसाहतीकडे जाणारा रस्ता वृक्षाने व्यापल्याने वसाहतींकडे जाणारा रस्ताही बंद झाला. यावेळी हायड्रा मशिनच्या साहाय्याने वृक्ष बाजूला करताना हायड्राही कलंडला. यानंतर काही तास प्रयत्न करून काही फांद्या तोडून पुन्हा दुसऱ्या हायड्रा मशिनच्या साहाय्याने या वृक्षाला बाजूला करण्यात यश आले. सदर वृक्ष वीज वाहिन्यांवर पडल्याने त्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या, तर विजेचा खांबही वाकला. शनिवारी पावसामुळे काही झाडांचे, घरांचे नुकसान झाले.पहिल्याच पावसात दासगाव पोलीस चौकी पाण्यात !महाड तालुक्यात शुक्रवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून, शनिवारीही संततधार कायम राहिल्याने दासगाव नाका परिसरात असलेल्या पोलीस आउटपोस्टसमोर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची आणि पोलिसांची मोठी गैरसोय झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने दासगावमधील नालेसफाईचे काम किती मंद गतीने सुरू आहे याचे चित्र स्पष्ट दिसून आले.महाड तालुक्यात गेले दोन दिवस दमदार पाऊस लागत असल्याने दासगाव आणि परिसरातील नाले, धबधबे आता वाहू लागले आहेत. शिवाय पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतात साचल्याने शेतकरी देखील सुखावला आहे. या पावसामध्ये दासगावच्या नालेसफाईचे चित्र रस्त्यात साचलेल्या पाण्याने समोर आले आहे. पावसाळ्यापूर्वीच काही गावांतील नालेसफाईचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र दासगाव नाका परिसरातील नालेसफाईचे काम अद्याप सुरू आहे. धीम्या गतीने सुरू असलेल्या सफाईच्या कामाचा फटका शुक्रवारी झालेल्या पावसाने दासगाव पोलीस आउटपोस्टला बसला. या ठिकाणी जाण्याकरिता रस्त्यालगत असलेल्या मोरीत कचरा साचल्याने नाल्यातून जाणारे पाणी वर आल्याने आउटपोस्टकडे जाण्याकरिता नागरिकांना पाण्यातून जाण्याची पाळी आली.दासगाव गाव मोठे असून जवळपास १२ वाड्यांमध्ये विभागलेले आहे. यातील दासगाव नाका परिसर हा महामार्गालगत असल्याने कायम गजबजलेला असतो. शिवाय या ठिकाणी दासगाव ग्रामपंचायतीचे कार्यालय देखील आहे. या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली.दासगावमध्ये दर शनिवारी बाजार असल्याने आसपासच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर गावात येतात. यामुळे दासगाव गावातील नाका परिसर हा पावसाळ्यापूर्वी साफ होणे गरजेचे होते. मात्र नालेसफाईला विलंब लागल्याने या परिसरात आता पावसाच्या पाण्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.नालेसफाईचे काम सुरू आहे, मात्र या भागातील नालेसफाईचे काम उद्यापर्यंत पूर्ण होईल. गाव मोठे असल्याकारणाने नालेसफाईचे काम पूर्ण होण्यास विलंब लागला. - प्रज्ञा खैरे, सरपंच, दासगांवग्रामपंचायतीने येथे साफसफाई व्यवस्थित न केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. हे खराब पाणी याच ठिकाणी असलेल्या विहिरीत गेल्याने विहिरीचे पाणी देखील खराब झाले आहे. शिवाय पोलीस चौकीत ये-जा करण्याकरिता त्रास होत आहे. - धनाजी पिंगळे, पोलीस हवालदार, दासगाव
एमसीएक्सपेक्षा शहरात सोने स्वस्त
By admin | Updated: June 26, 2016 00:45 IST