जालना : शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे चार वर्षांनंतर रविवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. जलाशयात १० दलघमी पाणी असून, पाणी पातळी १८.३ फूट आहे. हे पाणी पंधरा महिने पुरेल, असे पालिका अभियंत्यांचे म्हणणे आहे. जालना शहराला जायकवाडी जलवाहिनी होण्यापूर्वी याच निजामकालीन जलाशयातून पाणीपुरवठा होत असे. सद्यस्थितीत येथून नवीन जालना भागास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सतत चार वर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाण्यासाठी असुसलेल्या जलाशयात यंदा सुरूवातीपासून समाधानकारक जलसाठा होत गेला. जलाशयाच्या वरील परिसरात दमदार पावसामुळे जलाशयात पाण्याचा ओघ वाढत असून, रविवारी सकाळी घाणेवाडी ओव्हरफ्लो झाले. तब्बल चार वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जालनेकरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तलावाची पाणी पातळी क्षमता २३ फुट असली तरी १८ फुटनंतर तलाव ओव्हरफ्लो होतो. आज रोजी तलावात १८.३ फूट जलसाठा झाला आहे. हे १० दलघमी एवढे असून, हे पाणी सुमारे पंधरा महिने पुरणार आहे. (प्रतिनिधी) जालना शहराला पाणी पुरवठा करणारे घाणेवाडी जलाशय, जलशुद्धीकरण केंद्र आणि शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा वितरण करणारी यंत्रणा अत्याधुनिक करणार असल्याची माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी येथे दिली. घाणेवाडी जलाशय यंदा तुडुंब भरला असून, याचे जलपूजन गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, राम सावंत, पं. स. सदस्य दीपक कावले, विनोद रत्नपारखे, अॅड. राहुल हिवराळे, विनोद यादव, विष्णू वाघमारे, रोहीत बनवस्कर, भगवान मदन, जीवन सले, इसा पठाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यंदा घाणेवाडी जलाशय तुडुंब भरल्याने जालनेकरांचा उन्हाळा पाणीटंचाईमुक्त जाणार आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी घाणेवाडीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे पाणीपुरवठा अभियंता दासवाड यांनी सांगितले.
घाणेवाडी ‘ओव्हरफ्लो’
By admin | Updated: September 25, 2016 23:59 IST