जालना : रेल्वेस्थानकाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त आलेले दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी.के.श्रीवास्तव, नांदेड विभागाचे व्यवस्थापक पी.सी.शर्मा यांनी संपूर्ण रेल्वेस्थानकाचा आढावा घेऊन स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विशेष म्हणजे श्रीवास्तव यांनी स्थानकांतील प्रवाशांसोबत हितगुज करुन समस्या जाणून घेतल्या. श्रीवास्तव सकाळी सव्वा अकरा वाजता स्थानकांत दाखल झाले. विविध संघटनांचे निवेदने स्वीकारल्यानंतर त्यांनी संपूर्ण स्थानकाची पाहणी केली. नवीन इमारत प्रतीक्षागृहे तेथील सुविधांची पाहणी केली. स्थानकातील स्वच्छतेच्या मुद्यावरही त्यांनी भर दिला. रेल्वेपटरी स्वच्छतेबाबत त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. स्थानिक अधिकाऱ्यांनाही स्वच्छ रेले स्वच्छ भारत अभियान योग्य पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिल्या. रेल्वेची सिग्नल यंत्रणेचे त्या ठिकाणाहून नियंत्रण केले जाते त्या कक्षाची पाहणी केली. तेथील यंत्रणेची पाहणी केली. संबंधितांना सूचना दिल्या. तिकीट खिडकीस भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. स्थानकातील कँटीनची पाहणी केली. तेथील अन्न पदार्थांच्या दर्जाबाबतही संबंधितांशी चर्चा केली. काही सूचना दिल्या. नांदेड विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करण्याची मागणी रेल्वे नांदेड ते मनमाड हा मार्ग दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिन असून दक्षिण मध्ये रेल्वेने चालू हंगामात एकूण १८ नवीन रेल्वे गाड्या चालू केल्या; परंतु मराठवाड्यासाठी एकाही गाडीचे नियोजन करण्यात आले नाही. नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेत असल्यामुळे या विभागाकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते. जनशताब्दी एक्सप्रेस ही मध्य रेल्वेच्या अधिन असल्यामुळे जालना रेल्वे स्टेशनवर सर्व तयारी असून सुध्दा या गाडीला हिरवा कंदील मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. जालना-खामगाव, सोलापूर-जालना-जळगाव, जनशताब्दी औरंगाबाद-मुंबई या गाड्या मध्य रेल्वेच्या अधिन असल्यामुळे या मार्गाकडे हेतुतूरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी नांदेड-मनमाड हा मार्ग मध्ये रेल्वेला जोहण्यात यावा. जालना-खामगाव मार्गाला त्वरित मान्यता द्यावी. सोलापूर-जालना-जळगाव हा मार्ग मागास विभाग म्हणून केंद्राने त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा, परभणी-मनमाड या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी. विद्युत कॉलनी, रमाबाईनगर, आनंदनगर, सरस्वती कॉलनी, जमुनानगर या भागातील नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करुन राज्य शासनाने त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा, अजमेर-बिकानेर व गोरखपूर-बनारस यासाठी मनमाडमार्गे नवीन रेल्वे चालू करण्यात याव्या आदी मागण्या नांदेड विभाग दक्षिण मध्ये रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या . त्यावर सतिष बाभळे, तय्यब देशमुख, राम गायकवाड, दिलीप व्यास, अशोक पडुळ, रमेश देहेडकर, दिनकर घेवंदे, देविदास जिगे, श्रीकांत शेलगावकर, नविन पिंपळगावकर, रामेश्वर साठे, रामेश्वर लोखंडे, राजू ढवळे आदींच्या सह्या आहेत.
महाव्यवस्थापकांनी घेतला स्थानकाचा आढावा
By admin | Updated: June 9, 2015 00:21 IST