औरंगाबाद : घाटी रुग्णालय परिसरात बेवारस रुग्ण नरकयातना भोगत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्तानंतर दुसऱ्या दिवशी ‘बेवारस रुग्णांकडे घाटी प्रशासनाची पाठ’ या मथळ्याचे वृत्त लोकमतने दिले. लोकमतने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने मंगळवारी सकाळी चार रुग्णांना वॉर्ड क्रमांक १९ मध्ये भरती केले. यापैकी गँगरीन झालेल्या दोन रुग्णांवर तडकाफडकी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते अकील अहेमद हे औषधी, शस्त्रक्रियेचे साहित्य पुरविणार आहेत.गत सप्ताहात घाटी परिसरात बेवारस मृतदेहाला मुंग्या लागल्याची घटना उघडकीस आली होती. २ जानेवारी रोजी तेथे आणखी पाच रुग्ण नरकयातना भोगत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्तानंतर त्या रुग्णांना तातडीने उपचार मिळातील, अशी लोकमतला अपेक्षा होती. मात्र, कोणतीही हालचाल झाली नाही. ४ जानेवारी रोजी ‘त्या बेवारस रुग्णांकडे घाटीची पाठ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांनी अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, उपअधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांना कार्यवाहीची सूचना केली. डॉ. जेवळीकर यांनी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक नीलेश कोतकर, डॉ. राठोड, डॉ. चव्हाण यांना परिसरात थांबलेल्या रुग्णांचा आढावा घेण्यास सांगितले. ज्या रुग्णांना उपचाराची गरज आहे त्यांना तात्काळ दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी सकाळी बाबूलाल शंकरलाल वगदे (रा. सिल्लोड), कैलास केशव कुलकर्णी, भारत सोमनाथ भोसले आणि संजय यशवंत राजपूत (रा. जालना) यांना वॉर्ड क्रमांक १९ मध्ये दाखल करण्यात आले. यापैकी दोन जणांना गँगरीन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
चार बेवारस अखेर घाटीत
By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST