कुरूंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे ३० मे च्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार ठिकाणी घरफोडी केली. यात अंदाजे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून चोर्यांच्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, चार ठिकाणी चोरी होवूनही कुरूंदा ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही. कुरूंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या गिरगाव येथे मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ उकाड्यापासून बचावासाठी घराच्या छतावर, पत्र्यांवर झोपत आहेत. ही संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३ वाजेदरम्यान गिरगावात धुमाकूळ घातला. यामध्ये एका पाठोपाठ चार घरे फोडून सोन्याचे दागीने, रोख रक्कम व इतर साहित्य असा अंदाजे पाच लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. गिरगावातील देवीदास पांचाळ यांच्या घरातील सर्व सदस्य छतावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे समोरील दोन्ही दरवाजे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आलमारीचे कुलूप तोडून रोख १५ हजार रूपये व ९ तोळे वजनाचे सोने काढून केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा संभाजी सोनटक्के यांच्या घराकडे वळविले. सोनटक्के कुटुुंबिय लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना ही चोरी झाली. यात चोरट्यांनी घरातील कपाट व सुटकेस मधील ५ ग्रॅम सोने, नगदी ५ हजार रूपये, लहान मुलांचे १८०० रुपये किंमतीचे बाजूबंद लंपास केले. तसेच बंडू दत्तराम सोनटक्के यांच्या घरातून नगदी ६०० रुपये तसेच डब्यामध्ये ठेवलेले पैसे व इतर साहित्य चोरून नेले. सिद्धरामआप्पा धर्मले यांच्या घरावरही चोरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, गिरगाव येथे रात्रीच्या वेळी भारनियमन सुरू असल्याने ग्रामस्थ छतावर, पत्र्यांवर झोपण्यासाठी जात आहेत. शुक्रवारी रात्री ज्या-ज्या ठिकाणी चोर्या झाल्या, त्या घरातील सदस्य गच्चीवर झोपलेले होते. एकाच रात्री चार ठिकाणी चोर्या झाल्यामुळे ग्रामस्थ व व्यापार्यांमध्ये भिती पसरली आहे. गिरगाव येथे चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती देवूनही पोलिस घटनास्थळी लवकर पोहोचले नाहीत. तसेच कुरूंदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत गावास भेट दिली नव्हती. पोलिसांनी गिरगावातील चोर्यांचा प्रकार गंभीरतेने घेणे गरजेचे असताना त्याकडे साफ दुर्लंक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गिरगावचे बीट जमादार बी.टी. केंद्रे यांनी चोरी झालेल्या ठिकाणची माहिती घेतली; परंतु शनिवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चार चोरी झालेली असली तरी नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला? याची माहिती पोलिसांनी दिली नाही. जमादार केंद्रे यांनी आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. यासंदर्भात वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांना विचारले असता, कुरूंदा ठाण्याचे पोनि नागदरे हिंगोली येथे मिटिंगसाठी गेले असून त्यांना गिंरगाव येथे जाण्यास सांगितले आहे. मिटींगहून परत आल्यावर ते गावास भेट देतील, असे त्यांनी सांगिंतले.(वार्ताहर)कुरूंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या गिरगाव येथे मागील काही दिवसांपासून चोरटे सक्रिय झाले आहेत. शुक्रवारी रात्री गावातील चार ठिकाणी घरफोडी झाली आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ उकाड्यापासून बचावासाठी घराच्या छतावर, पत्र्यांवर झोपत आहेत. ही संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३ वाजेदरम्यान गिरगावात धुमाकूळ घातला. गिरगावात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती देवूनही पोलिस घटनास्थळी लवकर पोहोचले नाहीत. तसेच कुरूंदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत गावास भेट दिली नव्हती.
एकाच रात्रीत चार घरफोड्या
By admin | Updated: June 1, 2014 00:27 IST