उमरगा : तालुक्यातील पेठसांगवी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून एकाचा खून झाल्याची घटना २०१२ मध्ये घडली होती. या प्रकरणाची गुरूवारी सुनावणी झाली . उमरगा न्यायालयाने पाच जणांना जन्मठेप व ७५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.याबाबत सहाय्यक सरकारी वकील व्ही. एस. आळंगे यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार १ आॅक्टोबर २०१२ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पेठसांगवी येथील अमर माणिक यमगर यांच्या घरासमोरील चॉद रूद्रवाडी यांच्या पिठाच्या गिरणीसमोरील कट्यावर गावातीलच सय्यद मियॉलाल पठाण, आयाज इमाम पठाण, वजीर इसाफ पठाण हे आरडाओरडा करून गोंधळ करीत होते. त्यावर प्रभाकर यमगर व किशोर यमगर यांनी संबंधितांना ‘गोंधळ घालू नका’, असे बजावल्यानंतर ते तेथून निघून गेले. त्यानंतर रात्री साठेआठ वाजेच्या सुमारास सालगडी राजेंद्र जमादार शेतात मुक्कामास जाण्यासाठी प्रभाकर यमगर यांच्या घरी गेले. तेथून राजेंद्र जमादार आणि किशोर यमगर हे दोघेजण मिळून शेतात जात असताना गावातील सय्यद मियॉलाल पठाण, हुसेन पठाण, शमशोद्दीन पठाण, वजीर पठाण, आयाज पठाण, मुस्तफा मोगरगे, रशीद पठाण, सिराज पठाण, युसूफ सय्यद व ताहेर शेख यांनी रस्त्यात अडविले. यातील ताहेर महेबूब शेख, मुस्तफा बाबू मोगरगे, शिराज मकतू पठाण, रशीद अमीद पठाण धरले आणि सय्यद मियॉलाल पठाण याने हातातील चाकूने किशोरच्या छातीवर वार केले. त्यावर राजेंद्र जमादार यांनी पळत जावून घटनेची माहिती प्रभाकर यमगर यांना दिली. प्रकाश यमगर, माणिक यमगर, दैवताबाई, अमर यमगर यांनी घटनास्थळी येवून भांडण सोडविण्यासाठी मध्यस्ती केली. असे असतानाच सय्यद मियॉलाल पठाण याने चाकूने अमर याच्या पोटात वार केला. तसेच शिराज मक्तू पठाण याने माणिक मगर यांच्या मानेवर काठी मारली तेव्हा सय्यत पठाण पुन्हा अमरवर चाकूने वार करीत असताना तो चाकू चुकून रशिद पठाण यास लागून तो जखमी झाला. तर किशोर गंभीर जखमी होवून तो मयत झाल्याचे समजताच वरील सर्व लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला. माणिक यमगर यांना गंभीर जखमी अवस्थेत उमरगा येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर किशोर यास डॉक्टरांनी मयत घोेषित केले. त्यानंतर अमर यमगर यांच्या जबाबावरून उमरगा ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. घटनेचा तपास तत्कालीन सहा. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केला. तपासाअंती त्यांनी उमरगा न्यायालयात ११ जणांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सदरील खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. सुनावणीअंती पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.१२ साक्षीदार तपासले४सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज दानाई, जखमी अमर यमगर, डॉ. सुनील मंडाळे, राजेंद्र जमादार, प्रभाकर यमगर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. महत्वपूर्ण ठरल्या साक्ष४न्यायालयासमोर आलेले पुरावे आणि शासकीय अभियोक्ता व्ही. एस. आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अति. सत्र न्यायाधीश एम. एस. मुगळे यांनी पाच जणांना जेन्मठेपेची शिक्षा सुनावली. \सय्यद मियालाल पठाण, मुस्तफा बाबू मोगरगे रशीद अमीन पठाण, शिराज मक्तू पठाण, ताहेर महेबूब शेख (सर्व रा. पेठसांगवी) या पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तसेच ७५ हजार रूपये दंडही केला आहे. दरम्यान, सबळ पुराव्याअभावी सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST