बीड : वित्त आयोगाचा निधी सर्व सदस्यांना समप्रमाणात मिळाला पाहिजे, या मागणीवरुन गुरुवारी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे जोरदार खडाजंगी झाली. शेवटी सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागले अन् निधीचे वाटप समान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्षा आशा दौंड, सभापती संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, यांची उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीलाच मागील बैठकीत न झालेले ठराव इतिवृत्तात आल्याने भाजपा गटनेते मदानराव चव्हाण, दशरथ वनवे यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. जि.प. च्या पॅनलवर नियुक्त करावयाच्या वकिलांचा ठराव मागच्या बैठकीत चर्चेत नव्हता. मात्र, तो इतिवृत्तात उतरल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. मदनराव चव्हाण यांनी तेराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीला मंजूर होतो;पण निधी खर्चाचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतींची अडचण होते, असा मुद्दा उपस्थित केला. ग्रामपंचायतीलाच अधिकार द्यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी लावून धरली. हा ठराव मंजूर करण्यात आला. तेराव्या वित्त आयोगाच्या ४ कोटी २० लाख रुपयांच्या निधी वाटपावरुन सत्ताधारी- विरोधकांत जुंपली. भाजपाचे सदस्य आक्रमक झाल्यावर अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सर्व सदस्यांना समान निधी देण्याचे मंजूर केले.
वित्त आयोगावरून जि.प.मध्ये खडाजंगी
By admin | Updated: April 24, 2015 00:39 IST