जालना : अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळीच्या प्रकारसोबतच अन्न पदार्थांची निर्मिती शास्त्रीय पद्धतीने होते का यासाठी इतर मुद्यांचा तपास करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन आहे. मात्र हा विभाग थातूरमातूर कारवाई करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने गत तीन महिन्यात जिल्ह्यात फक्त १५ नमुने तपासले. या वरुनच प्रशासन किती सजग आहे याची कल्पना येते. जालना शहरातच छोटी मोठी मिळून ५०० पेक्षा अधिक हॉटेल्स, उपहारगृहे, स्वीटमार्ट, ढाबे आहेत. या ठिकाणी जनतेच्या आरोग्याची काळजी किती घेतली जाते ही सर्वश्रुतच आहे. सर्व प्रतिष्ठानांची अन्न व औषधी प्रशासनाने नियमित तपासणी करणे गरजेचे असतानाही याकडे कानाडोळा होत आहे. अनेक उपहारगृहे तसेच हॉटेल्स व ढाब्यांवर जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. स्वच्छतेच्या मुद्यांसह अनेक बाबी धोकादायक असल्याचे चित्र आहे. एप्रिल ते जून २०१५ या तीन महिन्यात विभागाने फक्त १५ नमुने तपासले. त्यात प्रमाणित ९ तर अप्रमाणित ६ नमुने आढळून आले. या प्रकरणी १ जणावर खटला दाखल करण्यात आला. गतवर्षी १३१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ११३ प्रमाणे प्रमाणित तर १८ अप्रमाणित निघाले. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध खटला दाखल झाला. याविषयी अन्न व औषधी प्रशासनाचे उपायुक्त अभय देशपांडे म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या कमरतेमुळे मोहीम राबविण्यास अडचणी येत आहेत. १ आॅगस्टपासून मोहीम राबविली जाईल. (प्रतिनिधी)
एफडीएच्या तपासणी मोहिमेचा फार्स !
By admin | Updated: July 30, 2015 00:15 IST