नांदेड : गत पंधरा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीची आवक वाढली आहे. त्यामुळे आडत व्यापारी व शेतकर्यांना खरेदीदारांची मनधरणी करावी लागत आहे. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात हळदीला ८७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर आवक वाढल्याने भाव गडगडला़ अवकाळी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांना काढणीला विलंब झाला. यामुळे मध्यंतरीच्या काही कालावधीत हळदीची आवक घटली होती. परंतु गेल्या पंंधरवाड्यापासून बाजारात आवक वाढली असून दिवसभरात जवळपास १५०० ते २ हजार क्विंटल खरेदी होत आहे. दर्जा चांगला असला तरी मंदीमुळे व्यापार्याकडून मागणी कमी झाली आहे. सर्व शेतकर्यांनी एकाच वेळी विक्रीसाठी हळद बाजारात आणल्याने व्यापार्यांना खरेदीदारांची मनधरणी करावी लागत आहे. एका आडत दुकानावर बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे. यामुळे शेतकरी वैतागला आहे़ खरिपाचा हंगाम जवळ येत असल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांना पैशाची आवश्यकता असूनही वेळेवर पैसै मिळत नसल्याने शेतकर्यापुढे अडचणी वाढल्या आहेत. मोंढा बाजारात खरेदीदारांची संख्या बोटावर मोजण्याएवढी म्हणजे केवळ चार ते पाच आहे. यामुळे खरेदीदारांच्या मर्जीनुसारच लिलाव बाजार करावा लागत आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने बाहेर जिल्ह्यातून खरेदीदार बोलावल्यास शेतकर्यांचा वेळेवर लिलाव होऊन भावही चांगला मिळेल. सोमवारी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला ४६०० पासून ६७०० रुपयापर्यंत भाव मिळाला आहे. त्या तुलनेत वसमत व हिंगोली येथील बाजारपेठेत ७००० पेक्षा जास्त भाव मिळाल्याचे शेतकर्यांनी सांगितले. मोंढा बाजारात नवीन वर्षात एप्रिल महिन्यात १२३९५ क्विंटल तर मे महिन्यात ६ मे पर्यंत ३८६५ क्विंटल अशी एकूण १६२६० क्विंटल हळदीची आवक झाली आहे. खरेदी करुनही माप होईना- व्यापार्यांनी लिलावात हळदीची खरेदी करुनही १० ते १५ दिवस माप होत नसल्याने शेतकर्यांना शेतमालाची विक्री करुनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. (प्रतिनिधी)
शेतकरी, अडत व्यापार्यांकडून खरेदीदारांची मनधरणी़
By admin | Updated: May 8, 2014 00:43 IST