लातूर : जिल्ह्याला १०१ कोटी २ लाख रुपयांची दुष्काळी मदत मिळाली असून, अद्याक्षरानुसार गावांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. प्रथम अद्याक्षरानुसार पहिल्या गावाची निवड होईल. ते गाव पूर्ण झाल्यानंतर त्याखालील अद्याक्षरानुसार गावांची निवड होईल व सातबारानुसार मदतीचे वाटप केले जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने अद्याक्षरानुसार गावांच्या याद्या करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार मदतीचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील ९४३ गावांतील अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.या सर्व गावांतील शेतकऱ्यांना सातबारावर नोंद असलेल्या पिकांनुसार मदत होईल. शासनाने १०१ कोटी २ लाख रुपये दिले असून, गरज भासल्यास आणखीन मदत मिळणार आहे. सव्वाचार लाख शेतकऱ्यांचे ६ लाख २१ हजार हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ४ हजार ५००, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी ९ हजार आणि फळ पिकांखालील जमिनीसाठी हेक्टरी १२ हजार रुपये तर अल्पभूधारकांना म्हणजे १० गुंठे अर्धा एकर असलेल्या शेतकऱ्यांसाठी १ हजार रुपये मदत देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सातबाऱ्यांचे अवलोकन महसूल प्रशासनाकडून सुरू आहे. सव्वाचार लाख शेतकऱ्यांना या सूत्रानुसार २० जानेवारीपर्यंत मदत खात्यावर जमा केली जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विश्वंभर गावंडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
२० जानेवारीपर्यंत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर
By admin | Updated: January 16, 2015 01:09 IST