औरंगाबाद : दहा वर्षांपासून रोशनगेट परिसरासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नागरिक दमडी महल पुलाच्या बांधकामाची मागणी करीत होते. त्या पुलाचे काम पालिकेने दोन दिवसांपूर्वी सुरू केले आहे. २००५ पासून त्या भागाचे नगरसेवक मुजीब आलम खान यांच्यासह नागरिकांनी त्या पुलाच्या कामाची मागणी वारंवार लावून धरली होती. जालना येथील कंत्राटदार अब्दुल कदीर यांना त्या पुलाचे काम देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांच्या देखरेखीखाली ते काम होणार आहे. दमडी महल पुलासाठी साईड वॉल बांधून ठेवण्यात आला आहे. कृषी कार्यालयाच्या भूसंपादनामुळे ते काम रखडले होते. पुलासाठी भूसंपादन झाले असून, विभागाला गजानन महाराज मंदिर परिसरातील रिलायन्स मॉल येथील पालिकेच्या मालकीची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे पुलाचे काम सुरू करण्यात येणारी भूसंपादनाची अडचण संपली आहे. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही वारंवार पालिकेला त्या पुलाच्या कामासंदर्भात आदेशित केले. तत्कालीन आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, विद्यमान आयुक्त डॉ.कांबळे यांच्यासोबत त्या पुलाची पाहणी केली होती. कार्यकारी अभियंता सिद्दीकी म्हणाले, त्या पुलाचे काम झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या सुटणार आहे. मनपाने ते काम सुरू केले आहे.
१० वर्षांपासूनचा वनवास संपणार
By admin | Updated: May 22, 2014 00:54 IST