जालना : समाजात आज अनेक रूग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. या रूग्णांना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी केले.जालना शहरातील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात नगर परिषद व जिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबीर व महाअवयवदान अभियान जनजागृती शिबीराच्या उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पाटील बोलत होत्या.यावेळी मनकर्णा डांगे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुनिता गोलाईत, डॉ. वि.भा. भिवरे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावकस्कर, तृप्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील पुढे म्हणाल्या की, अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करून अवयवदानासंदर्भात समाजामध्ये आजही अनेक गैरसमज असून ते दूर होणे गरजेचे आहे. आपल्या अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नव्याने जीवन प्राप्त होणार असल्याने प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.यावेळी अवयवदानाचे महत्व पटवून देणारा ‘फिर जिंदगी’ हा लघुपटही उपस्थितांना दाखिवण्यात आला. तसेच तज्ज्ञांनी महिलांची व बालकांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यंकट कुलकर्णी यांनी मानले.बचतगटातील महिला सदस्या, रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
अवयव दानाचा संकल्प प्रत्येकाने करावा-पाटील
By admin | Updated: September 1, 2016 01:00 IST