लातूर : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या बीए, बी.एस्सी. परीक्षेचा निकाल लागला असून, त्याचे गुणपत्रकही विद्यार्थ्यांच्या हाती पडले आहेत. त्या गुणपत्रकांमध्ये एटीकेटीमध्ये पात्र विद्यार्थ्यांनाही नापास करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांना इंटर्नलचे गुणच दिले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बी.ए., बी.एस्सी. प्रथम वर्षाचा निकाल नुकताच लागला आहे. त्याच्या गुणपत्रकाचे वाटप बुधवारी करण्यात आले. परंतु, विद्यापीठाने दिलेल्या गुणपत्रिकामध्ये एटीकेटीमध्ये पात्र अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांना इंटर्नलचे गुण देण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे. महाविद्यालयांनी इंटर्नल मार्क्सांची यादी पाठविली असताना त्याची नोंद गुणपत्रिकेत नाही. विद्यापीठाच्या या चुका विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार आहेत. त्या दुरुस्त केल्या जाव्यात, अशी मागणी रेणापूर युवा सेनेच्या वतीने विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या कुलगुरुंशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न युवा सेनेने केला होता. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यापीठ उपकेंद्रामार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर भीमाशंकर चापुले, अनिल भारसकर, अजिंक्य कदम, हरिभाऊ गायकवाड, विशाल कांबळे, अमित तळेकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(प्रतिनिधी)
बी.ए., बी.एस्सी.च्या गुणपत्रिकेत चुका !
By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST