औरंगाबाद : मान्यताप्राप्त प्राध्यापकांनी अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात योगदान द्यावे. ज्यामुळे दरवर्षी निकाल जाहीर करण्यासाठी होणारा विलंब टाळून यंदा विद्यापीठाला २३ आॅगस्टपूर्वी निकाल जाहीर करता येईल. जे प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात कुचराई करतील, त्यांच्याविरुद्ध तसेच संबंधित महाविद्यालयांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिला आहे. दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सर्व प्राचार्यांची बैठक कुलगुरू डॉ. चोपडे यांनी विद्यापीठात घेतली. बैठकीत उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात किमान ५० टक्के मान्यताप्राप्त प्राध्यापकांना सहभागी करण्याचे आवाहन डॉ. चोपडे यांनी केले. विद्यापीठाशी संलग्नित १८ अभियांत्रिकी महाविद्यालये असून, त्यात ३० हजार विद्यार्थी शिकतात. २ जून रोजी अभियांत्रिकी विद्याशाखेची परीक्षा सुरू झाली. ही परीक्षा सोमवारी ७ जुलै रोजी संपणार आहे. नियमानुसार परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक असते; पण मागील काही वर्षांपासून प्राध्यापकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे उत्तरपत्रिका तपासणीमध्ये उशीर होतो. प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठविण्याची जबाबदारी प्राचार्यांनी घ्यावी. जर प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आले नाहीत, तर संबंधित महाविद्यालय तसेच प्राध्यापकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. चोपडे यांनी दिला.
अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल लागणार २३ आॅगस्टपूर्वी?
By admin | Updated: July 6, 2014 00:34 IST