औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरातील बीड बायपासवर अतिक्रमण हटाव पथकाचा ताफा कोणत्या इमारतीवर जाईल या विषयी कुणालाच माहिती नसते. त्यामुळे पूर्व- पश्चिम - दक्षिण की उत्तर असे सारखे फोन खणखणत असून, कारवाईच्या भीतीने नागरिकांत धडकी भरली आहे. अनेकांनी भूखंडावर इमारती चढविल्या असून, त्या विक्री करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला; परंतु तांत्रिक बाबींचा अभाव असल्याने प्रशासनाची ‘दबंगगिरी’ बिल्डरच्या मानगुटीवर बसली आहे. अतिक्रमण हटाव पथकाची यंत्रणा जिकडे जाईल, त्या दिशेकडे नजरा खिळत आहेत. कोणत्या बांधकामावर हातोडा पडेल याविषयी अतिगुप्तता बाळगली जात आहे. बांधकाम व्यावसायिकांनी कामे बंद ठेवल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारवाई झालेल्या व्यक्ती इतरांच्या इमारती प्रशासनाला दिसत नाहीत का, असा सवाल विचारत आहेत. एनए-४७ बीचा प्रश्न प्रशासनाने अद्याप मार्गी लावलेला नाही. बांधकाम व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी स्वप्नील अकोलकर, शेख मुजीब, सचिन धांडे, विशाल करोडवाल, दिनकर खडसे आदींनी केली आहे.