लातूर : लातूर शहरात सध्या सुरू असलेले टँकरचे पाणी समन्यायी पद्धतीने वाटप होत नाही. ठराविक भागांतच पाणी दिले जात असून, सर्वसामान्य जनता मात्र पाणीटंचाईने आजही होरपळत आहे. समन्यायी पाणी वाटप करण्यासाठी महापालिकेने नळाद्वारेच पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नळाद्वारे पाणी देण्याची आयुक्तांकडे मागणी केल्यानंतर लागलीच भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन नळाद्वारे पाण्याचा आग्रह केला आहे.लातूर शहराला विविध ठिकाणाहून पाणी येत आहे़ त्यामुळे सर्वांना पाणी मिळत नाही़ शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहेचविण्यासाठी महानगरपालिकेने नळाद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे़ निवेदनावर राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद सावे, नगरसेवक राजा मणियार, शैलेश स्वामी, राजेंद्र इंद्राळे, नवनाथ आल्टे, स्रेहलता अग्रवाल, इर्शाद तांबोळी, दीपाली इंद्राळे, विनोद रणसुभे, राहुल माकणीकर, कौसरबी सय्यद, प्रशांत पाटील, इब्राहिम सय्यद, शारदा बनसोडे, मुक्तार शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने विशेष बाब म्हणून लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र उपलब्ध होणारे पाणी मनपाच्या वतीने वितरीत होत असल्याने अनेकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस नळाद्वारेच पाणी द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शहर जिल्हा शाखेने आयुक्तांकडे केली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, अॅड. प्रदीप मोरे, गणेश हेड्डा, राजकुमार परदेशी, सुनील मलवाड, प्रशांत राचट्टे, सतीश ठाकूर, प्रवीण येळे, प्रकाश सोनवणे, संतोष पांचाळ, गणेश कलमे, पप्पू भालेराव, अॅड. ललित तोष्णीवाल, उमेश नागरगोजे आदींची उपस्थिती होती. लातूर महापालिकेला उपलब्ध होणारे पाणी योग्यप्रकारे वितरीत करता येत नाही. तसेच उपलब्ध होणारे पाणी व वितरीत होणारे पाणी यात कसलाही ताळमेळ नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. महापालिकेने आठवड्यातून एकवेळा नळाद्वारे पाणी दिले पाहिजे. शासनाच्या पैशाचा व पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप भाजपाच्या शहर जिल्हा शाखेने केला आहे. तर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबु खंदाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन पाणी वाटपासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, मनपाच्या यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे शासनानेच नियोजन हाती घ्यावे, अशी मागणी केली. शिवाय, राज्य शासनाने दिलेल्या पाण्याचे श्रेय भाजपा सरकारला मिळू नये, यासाठी मनपा राजकीय खेळी खेळत असल्याचा आरोपही खंदाडे यांनी केला.शहरातील प्रभाग क्र. १७ मध्ये मनपाच्या टँकरसोबत खाजगी लोक पाणी वितरीत करीत आहेत. त्यामुळे तोंड बघून पाणी दिले जात आहे. सर्वांना समान पाणी मिळत नाही. महापालिकेने तात्काळ कर्मचाऱ्यांची टँकरवर नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अयुब मणियार, गणपती केंद्रे, फेरोज पठाण, दिलीप भांडेकर यांनी केली आहे. प्रकाश नगर, गिरवलकर नगर, कपिल नगर, विकास नगर, राम-रहीम नगर, मुस्तफा कॉलनी, आनंद नगर, अंजली नगर, शाम नगर आदी भागांत पाणी मिळत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. याशिवाय, शहराच्या रिंग रोड लगत असलेल्या भागांमध्ये पाणी वितरणात विस्कळीतपणा आहे. नगरसेवकांच्या हाती यंत्रणा असल्याने ठराविक भागातच पाण्याचा पूर आहे. रेल्वेने पाणी येत असल्याने आता लातूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महापालिकेने टँकरऐवजी नळाद्वारे पाणी दिल्यास अधिक सोयीचे होईल, अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. महापालिकेकडून टँकरने सुरू असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. ठराविक भागांतच पाणी जात असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. मनपा दप्तरी प्रत्येक टँकरवर कर्मचारी नियुक्त केल्याची नोंद आहे. परंतु, अनेक प्रभागांत कर्मचारी पाणी वाटपाच्या कामात नाहीत. त्यामुळे नगरसेवक किंवा त्यांचे कार्यकर्ते पाणी वाटप करीत आहेत. राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांतून केला जात आहे. (प्रतिनिधी)
नळाद्वारे पाणी देण्याच्या मागणीला जोर
By admin | Updated: April 25, 2016 00:39 IST