परभणी: मनपाच्या नियोजनाअभावी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. मागील दोन महिने १० ते १२ दिवसांतून एकवेळ शहरवासियांना पाणी मिळत होते. त्यात अल्पशी सुधारणा करीत हा पाणीपुरवठा आठ दिवसांआड करण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये आठ दिवसांना पाणी मिळत असल्याने उन्हाळ्यातील स्थिती काय असेल, याचा विचार न केलेलाच बरा. महानगरपालिकेच्या वतीने राहटी येथील बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. परभणीची पाणीपुरवठा योजना तीस वर्षापूर्वीची आहे. दीड लाख लोकांना पाणी पुरविण्याची क्षमता या योजनेची आहे. परंतु, सध्या शहराची लोकसंख्या तीन लाखांच्यावर गेली आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना अपुरी पडते. नागरिकांना किमान एक दिवसाआड पाणी मिळणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे शहरासाठी मुबलक पाणीसाठाही उपलब्ध आहे. परंतु, मनपाचे नियोजन होत नसल्याने पाणीपुरवठा वेळेवर व नियमित होेत नाही. परिणामी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यात शहराला ११ व्या दिवशी पाणी मिळत होते. महिन्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा होत होता. पाण्याची ओरड वाढल्यानंतर महानगरपालिकेने नियोजन केले असून आता हा पाणीपुरवठा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. आठ दिवसांतून एक वेळ म्हणजे महिन्यातून चार किंवा पाच वेळा शहराला पाणीपुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)
आठ दिवसाआड पाणी
By admin | Updated: August 19, 2014 02:13 IST